ईसोलीचे येवले दाम्पत्य आजपासून करणार मोबाईलचा उपवास! नूतन वर्षाचा संकल्प; आठवड्यातून एक दिवस मोबाईल ठेवणार बंद ..

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तसे पाहिले तर मोबाईल आज काळाची गरज झालेला आहे. मोबाईलचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही. गुड मॉर्निंगपासून तर गुड नाईटपर्यंत मोबाईल सोबत असतोच. मात्र दुसरीकडे मोबाईलचा वाढता वापर सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चिखली तालुक्यातील ईसोली येथील गोविंद येवले व अनिता येवले दाम्पत्याने अनोखी शक्कल लढवत यावर उपाय शोधला आहे. उद्या रविवार म्हणजे २८ डिसेंबरला दोघेही मोबाईलचा कडक उपवास करणार आहेत. नूतन वर्षानिमित्त आठवड्यातल्या दर रविवारी सक्तीने मोबाईल बंदी पाळण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. 
आजचे युग हे प्रगत तंत्रज्ञानाचे आहे. उजडणारा प्रत्येक दिवस नवीन तंत्रज्ञानाची भर घालतो. नव्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतले तर बरे, अन्यथा तुम्ही जगाच्या मागे पडणार. जुना लँडलाईनचा फोन कालबाह्य होऊन हाती आलेला मोबाईल हा प्रगत तंत्रज्ञानाचा प्रबळ दावेदार म्हणता येईल. मोबाईलने स्वतःला सर्वांत अपडेट ठेवले आहे. मल्टिपर्पज  व्याख्येत मोबाईल फिट्ट बसतो. एकप्रकारे मोबाईलने आपल्यावर ताबा मिळवला आहे. मोबाईलशिवाय आपण एक मिनिट राहू शकत नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला मोबाईल लागतो.एका बाजूने विचार केला तर मोबाईलचा वापर फायद्याचा आहे. तर त्याची दुसरी बाजू नुकसानकारक आहे. 

मोबाईलच्या वाढत्या वापराने समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांचे संसार मोबाईलमुळे धोक्यात आल्याचे उदाहरणे आहेत. लहान मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत असल्याचे डॉक्टर सांगतात. मुलांमध्ये कमी वयात चिडचिडेपणा, मानसिक ताण, एकलकोंडेपणा अशा समस्या वाढल्या आहेत. याला मोबाईल जबाबदार आहे. विद्यार्थी शाळेत लक्ष देण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रिनवर वेळ घालवतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने स्पर्धेत मागे पडत आहेत. लेकरांच्या वाढत्या मोबाईलवेडाने आई-वडील त्रस्त झाले असून जवळपास प्रत्येक घरात हीच समस्या आहे. तज्ञ मंडळी मोबाईलचा वापर कमी करण्याबाबत सल्ला देतात. याकडे वेळीच लक्ष दिल्यास बरे नाहीतर भविष्यात गंभीर परिणाम समोर येतील एवढे नक्की.

 

चांगल्याची सुरुवात स्वतःपासून 

चिखली तालुक्यातील ईसोली येथील गोविंद येवले हे राजर्षी शाहू मल्टिस्टेटमध्ये विभागीय व्यवस्थापक आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करण्याचा त्यांचा मानस असतो. नवीन वर्षानिमित्त मोबाईलचा  उपवास करण्याचा संकल्प ही प्रेरणा सुद्धा संदीपदादांकडून घेतल्याचे येवले सांगतात. या संकल्पामध्ये त्यांच्यासोबत पत्नी शिवसेना (उबाठा)चिखली तालुका महिला आघाडी प्रमुख अनिता येवले सुद्धा सहभागी झाल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक रविवारी दोघेही सक्तीने मोबाईल बंदी पाळणार आहेत. येवले दाम्पत्य दोघेही महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मोबाईल वापरणे त्यांना गरजेचा आहे; मात्र तरीसुद्धा त्यांनी मोबाईलचा उपवास करण्याचा संकल्प घेतला आहे. इतरांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.