केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टी बाधित शेतजमिनीची पाहणी करत पंचनाम्याचे चावडी वाचन करण्याचे आवाहन..!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनाम्यामध्ये करून त्याचे चावडी वाचन करून घ्या, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे  बाधित झालेल्या भागांची ना. जाधव यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासनातील अधिकारी यांच्यासह माया म्हस्के, गजानन मोरे, विलास घोलप, भास्कर राऊत, शरद हाडे, पंडित देशमुख, शंतनू बोंद्रे, एकनाथ जाधव, अरविंद माने, अंकुश पाटील, डॉ सपकाळ हे उपस्थित होते.

 नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे. नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केले आहे. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने नुकसानीची नोंद तपासून पहावी. पंचनाम्यांचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,असे आवाहन देखील ना.जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना केले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केली. यावेळी ना. जाधव यांनी चिखली शहरातील माळीपुरा भागातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली  त्यानंतर तालुक्यातील सोमठाणा, उत्रदा, पेठ, बोरगाव काकडे, पांढरदेव, भोरसा भोरसी या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.