शेतकऱ्यांचे हाल पण पालकमंत्री गायब? राष्ट्रवादी शरद पवार गटाची पोलिसांत तक्रार...
Sep 25, 2025, 11:40 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड हाहाकार माजवत हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून तातडीने मदतीची अपेक्षा आहे. मात्र, या कठीण काळात जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील व सहपालकमंत्री संजय सावकारे हे जनतेच्या बांधावर न पोहोचल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने थेट पोलिसांत तक्रार दाखल करून दोन्ही पालकमंत्री “हरवल्याचा” ठपका ठेवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खामगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधी बेपत्ता होणे लाजिरवाणे आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्री तात्काळ हजर व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी शोधपथक पाठवून पालकमंत्र्यांचा ठावठिकाणा लावावा, अशी विनंतीही करण्यात आली.
विशेष म्हणजे, २० सप्टेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चिंतन बैठकीत मंत्र्यांना व आमदारांना आपल्या जबाबदारीच्या जिल्ह्यात नियमित हजेरी लावण्याची तंबी देण्यात आली होती. तरीसुद्धा बुलढाण्यातील गंभीर परिस्थितीत पालकमंत्र्यांची अनुपस्थिती अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी केवळ आपल्या सोयीने मलकापूर भागात मर्यादित पाहणी केली, असा आरोपही पक्षाने केला आहे.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे, तालुकाध्यक्ष संजय बगाडे, अल्पसंख्याक नेते शेख अयाज, डॉ. ज्ञानेश्वर रावनकार, संतोष पेसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जबाबदार धरण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.