प्रामाणिकपणा आणि संघटन कौशल्याला पक्षाची दाद; गजानन धांडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी! घोषणा होताच बैठकीत टाळ्यांचा कडकडाट..!.
रविवारी (दि.१२ जुलै) बुलढाणा येथील रेसिडेन्सी येथे झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने पक्षश्रेष्ठींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, दत्ता पाटील, वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, वसंतराव झाल्टे यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजानन धांडे यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या अभ्यासू वृत्ती, निर्भीड भूमिका आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक उपक्रमांचे प्रभावी नियोजन, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधण्याची हातोटी आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ते जिल्ह्यातील एक विश्वासार्ह व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या गुणांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा समन्वयकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीची घोषणा होताच उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात गजानन धांडे यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत पक्ष विस्तार, संघटन बळकटी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रभावी समन्वय साधण्याबाबत विश्वास व्यक्त केला.
नवनियुक्त जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडत बुलढाणा जिल्ह्यातील संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला सोबत घेऊन काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटन विस्तारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.