दोन दिवसांत जिल्ह्यातील २२२ गावांना अतिवृष्टीचा तडाखा; ५८ हजार ४९९ हेक्टवरील पिके पाण्यात; पाच तालुक्यांतील पिकांचे मोठे नुकसान,११ महसूल मंडळामध्ये पुन्हा अतिवृष्टीची नाेंद..!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी, अतिपाऊस आणि ढगफुटीसदृश पावसामुळे  जिल्ह्यातील तब्बल २२२ गावे बाधित झाली असून ११ महसूल मंडळांतील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. या आपत्तीमुळे अंदाजे ५८,४९९ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.
सर्वाधिक पाऊस मलकापूर तालुक्यात मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा मंडळाने तब्बल १७६.३ मिमी पावसाची नोंद केली. त्याचप्रमाणे सिंदखेडराजा व तुळजापूर (देऊळगाव राजा) मंडळात प्रत्येकी १५१.८ मिमी पाऊस झाला. यामुळे शेतजमिनींवर पाणी साचून सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यात २४ तासांत सरासरी १०२.३ मिमी पाऊस नोंदविला गेला. 

पावसाचा तडाखा बसलेली मंडळे
चिखली तालुका : पेढ (६९ मिमी) , देऊळगाव राजा तालुका : तुळजापूर (१५१.८ मिमी), अंढेरा (६८.५ मिमी), सिंदखेड राजा तालुका : सिंदखेड राजा (१५१.८ मिमी), किनगाव राजा (६९.८ मिमी), दुसरबीड (६५.५ मिमी),मलकापूर तालुका : मलकापूर (१२३.५ मिमी), नरवेल (७९.३ मिमी), धरणगाव (७९.३ मिमी), जांभूळधाबा (१७६.३ मिमी) आणि मोताळा तालुका : शेलापूर (६८.८ मिमी)

मलकापूर तालुक्यातील ७८ गावांना फटका दाेन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील ७८ गावांमधील ३६ हजार ५८५ हेक्टरवरील साेयाबीन आणि कापूस पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच देउळगाव राजा तालुक्यातील ६ हजार ३९६ हेक्टवरील साेयाबीन व भाजीपाला, सिंदखेड राजा तालुक्यातील ५४ गावातील १५ हजार २३३ हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. तसेच नांदुरा तालुक्यातील १७ गावे, २२५ हेक्टवरील पिके, बुलढाणा तालुक्यातील ५ गावातील ४५ हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. शेगाव तालुक्यातील ४ गावातील १५ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. 


 सुदैवाने जीवीतहानी नाही 
सुदैवाने या आपत्तीत जीवितहानी झालेली नाही. पण शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुलढाणा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांना मोठा फटका बसला असून काही फळपिकेही बाधित झाली आहेत.