वारीत आला हृदयविकाराचा झटका; आरोग्य योजनेमुळे वाचले प्राण!आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजनेचा वेळीच लाभ मिळाल्याने वृद्ध वारकऱ्यांचे प्राण वाचले...

 
पंढरपूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क) : आषाढी वारीसाठी नांदेडवरून पंढरपूर येथे आलेले ७५ वर्षीय वारकरी बालाजी संगेकर यांना वारी दरम्यान अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती घटनास्थळीच चिंताजनक बनली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने डॉ. काने हॉस्पिटल, पंढरपूर येथे दाखल करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीत संगेकर यांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित होता. मात्र, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत संगेकर यांच्यावर पूर्णतः मोफत उपचार करण्यात आले.

 

या योजनेमुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक भार न पडता प्राण वाचले. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू केलेल्या एकत्रित आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत १३५६ आजारांवर मोफत उपचाराचा समावेश असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सेवा मिळण्यासाठी ETI सुविधा देखील उपलब्ध आहे. राज्यभरात दोन हजारांहून अधिक अंगीकृत खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येतो. अशा आरोग्य योजनेमुळे वारीतील हजारो वारकऱ्यांना वेळेवर मदत मिळून जीव वाचण्यास हातभार लागतो.