पाण्यासाठी ३८ गावांचा एल्गार! अर्धवट योजनेविरोधात शेगाव तहसीलसमोर धरणे आंदोलन; खारपाण्यामुळे आजारांचा धोका; महिलांचा आक्रोश दीड महिन्यात काम पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा...

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील ३८ गावांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत रखडल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हा संपूर्ण परिसर खारपाणपट्ट्यात येत असल्याने नागरिकांना नाईलाजाने खारे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असून, त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या गंभीर परिस्थितीतून मुक्तता मिळावी आणि पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष रामा थारकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

आंदोलनस्थळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत काही वेळातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी दीड महिन्यांत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

आश्वासन फसवे ठरल्यास उग्र आंदोलन

“दीड महिन्यात ३८ गावांमधील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली नाही, तर प्रत्येक गावातील हजारो नागरिकांसह सरपंच संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल,”
असा ठाम इशारा तालुकाध्यक्ष रामा थारकर पाटील यांनी दिला.

महिलांचा मोठा सहभाग

या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.
राजू मिरगे, पवन बरिंगे, लक्ष्मण गवई, सुधाकर बावस्कर, शारदा ससे, सदानंद पुंडकर, सीमा गवई, ज्ञानेश्वर दळी, श्रद्धा पिसे, शारदा पारस्कार, विजय धंदर, मुकिंदा सुलताने, शीला चराटे, इनायत खान, समाधान खंडेराव, पंडित परघमोर, अमोल भांगे, विलास ससाने यांच्यासह ३८ गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.