पूलाअभावी थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार; अमोना ग्रामस्थांचा सामूहिक जलसमाधीचा इशारा...

 
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जालना जिल्ह्यातील डोलखेडा बुद्रुक धरणाचे बॅक वॉटर अमोना ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने ग्रामस्थांना रोज थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार करावी लागत आहे. ही जीवघेणी कसरत करताना महिला व पुरुष दोघांनाही धोका पत्करावा लागतो. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी ३० सप्टेंबर रोजी सामूहिक जलसमाधीचा इशारा दिला आहे.
दररोज नदी पार करण्यासाठी ग्रामस्थ दोराच्या साह्याने तराफा ढकलत दुसऱ्या काठावर पोहोचतात. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते. धरणाचे बॅक वॉटर वाढल्याने नदीचा प्रवाह तीव्र होतो आणि शेतजमिनी, रस्ते व पिके पाण्याखाली जातात. मात्र, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

या समस्येबाबत ग्रामस्थांनी २२ सप्टेंबर रोजी जालना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. १९९२ मध्ये बांधलेल्या डोलखेडा धरणामुळे निर्माण होणारे बॅक वॉटर आजवर अमोना व परिसरातील शेकडो कुटुंबांसाठी मोठा अडथळा ठरत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, बॅक वॉटरचा निचरा करण्यासाठी ड्रेनेज किंवा कटऑफ योजना राबवावी, नदीवर कायमस्वरूपी पूल उभारावा आणि पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

आरोग्य सेवेतही मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना दवाखान्यात नेणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात २०० ते ५०० कुटुंबे बॅक वॉटरमुळे अडकून पडतात.

नदीवर पूल नसल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटतो. सावरखेड, गोंधनखेड, सिपोरा, वरूड या गावांची वाहतूक ठप्प होते. चारशे ते पाचशे एकर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होते. शेतकरी जमीन पडिक पडू नये म्हणून तराफा बनवून नदी पार करतात. सांडव्याची उंची वाढवल्याने बॅक वॉटरची पातळी आणखी वाढल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.