सण-उत्सव एकोप्याने साजरे करा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन; आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक..!
पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की, गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हा सण आनंदाने आणि शांततेत पार पडावा. “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला जाईल. सोशल मीडियावरील अपप्रचार, आक्षेपार्ह संदेश रोखण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल. शांतता समिती सदस्यांनीही या बाबतीत सजग राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सभेत उपस्थित शांतता समिती सदस्यांनी सणांच्या दरम्यान आवश्यक सोयी-सुविधांबाबत सूचना मांडल्या आणि गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद शांततेत आणि एकोप्याने साजरा करण्याचे आश्वासन दिले. या वर्षी जिल्ह्यात एकूण १,३८५ सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन होणार असून त्यापैकी ४७० मंडळे शहरी भागात तर ९२५ मंडळे ग्रामीण भागात असतील. यापैकी ३०७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिली.
सभेनंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी श्रीगणेशोत्सव समन्वय समितीची बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
