मित्राच्या १६ वर्षीय बहिणीवर प्रेमाचे जाळे...तिला घेऊन रफूचक्कर!

 
file photo
वर्धा : दोघे जिगरी दोस्त. त्यामुळे एकमेकांच्या घरी नेहमी येणे जाते होते. त्यामुळे मित्राच्या १६ वर्षीय बहिणीवर त्‍याची नजर फिरली. तिच्याशी ओळख वाढवून त्‍याने तिला प्रेमात पाडले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. वर्धा शहर पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणाने गद्दार मित्राविरुद्ध तक्रार दिली आहे.

करण अशोक मसराम (रा. सरकारी क्वार्टर, सामान्य रुग्णालय, वर्धा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सुमित (पीडितेची ओळख जाहीर होऊ नये म्‍हणून नाव बदलले आहे.) हा वर्धा शहरात ऑटो चालवतो. तो पुलफैल वाॅर्ड क्रमांक २७ मध्ये राहतो. त्याला ५ बहिणी असून, तिघींचे लग्न झाले आहे. सुमितचा मित्र करण हा नेहमी त्याच्या घरी यायचा. त्यातूनच करणची सुमितची बहीण सोनलशी (नाव बदलले आहे.) ओळख झाली.

सोनल आवडू लागल्याने करण नेहमीच सुमितच्या घरी येऊ लागल्या. मात्र सुमितचा जिगरी दोस्त असल्याने त्याच्यावर कुणाला संशयही आला नाही. करण आणि सोनलचे प्रेम दिवसेंदिवस बहरत चालले होते. मात्र याची कुणकुणसुद्धा सुमित व त्याच्या घरच्यांना नव्हती. २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सोनल कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचा नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र तरीही ती सापडली नाही.

सोनलला करणने पळवून नेल्याची माहिती सुमितला मिळाली. सुमितने करण च्या घरी जाऊन बघितले असता करणसुद्धा घरून बेपत्ता असल्याचे त्याला कळले. करणचा फोनही बंद येत असल्याने दोस्त दोस्त म्हणवणाऱ्यानेच गद्दारी केल्याची सुमितची खात्री झाली. करणनेच माझ्या अल्पवयीन बहिणीला फुस लावून पळवून नेले, अशी तक्रार सुमितने वर्धा शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी करणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.