Amazon Ad

अबब ! सहा महिन्यात जिल्ह्यात ४०० पार अपघात! 'इतके' मृत्युमुखी पडले! अपघातांच्या घटना वाढल्याचे कारण ?

 
बुलडाणा (अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यात संपूर्ण जिल्हाभरात एकूण ४०९ अपघातांच्या घटना घडल्या. ही बाब चिंता वाढवणारी असून अपघातांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. तरी, चालकांच्या दुर्लक्षपणा मुळे व युवकांच्या बेशिस्तपणामुळे अनेक अपघात घडल्याचे दिसून येते. 
मागील महिन्यातभरात जिल्ह्यातील कुप्रसिद्ध समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका पाहायला मिळाली. अजूनही या मार्गावर अपघातांच्या घटना थांबत नसल्याचे भीषण चित्र आहे. वाढत्या अपघातांच्या घटनांवरून जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी चिंतन केले आहे. वाहतूक विभाग व आरटीओ विभागाद्वारे विशेष लक्ष घालण्यात आले असले तरी पाहिजे तसे वाढत्या घटनांवर आळा घालण्यात यश मिळाले नाही. गत ६ महिन्यातील ४०९ अपघातांची आकडेवारी गंभीर स्वरूपाची असून प्रशासनाने महत्त्वाचे काही निर्णय घ्यावे. असे बोलल्या जात आहे. 
"इतक्यांवर" कोसळला अपघात रुपी काळ! 
जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत एकूण ४०६ अपघात घडलेत. त्यातून २२० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २३४ जण जखमी झाल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.