शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्यांच्या राजकीय गढ्या उद्धवस्त करु !दरेगावच्या मेळाव्यात बरसले रविकांत तुपकर! म्हणाले, बळीराजासाठी तुरुंगातच नव्हे तर फासावरही जाण्यासाठी तयार

 
ravikaanttupkar
बिबी( ऋषी दंदाले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या हितासाठीचा आपला लढा पूर्वीपासून सुरु आहे आणि यापुढेही सुरुच राहणार आहे. आंदोलन केले म्हणून तुरुंगात टाकले, म्हणून हे आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुरुंगातच काय तर फासावर जाण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही देतानाच शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्यांना बळीराजा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्या राजकीय गढया उद्धवस्त करु, असा इशाराही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे १९ मार्च रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांविरोधात बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर रविकांत तुपकर वीजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या सरींसारखे बरसले.

दरेगाव येथे शेतकरी मेळावा पार पडला. तत्पूर्वी गावकऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात प्रचंड उत्साहात मिरवणूक काढून तुपकरांचे जंगी स्वागत केले. पुढे बोलतांना रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही सत्तेत असतनांही आंदोलन करता ते चांगले आणि शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला तर नौटंकी होते का? असा सवाल उपस्थित करत सत्ताधारी आमदारांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले पाहीजे. सोयाबीन-कापसाची दरवाढ, पीकविमा, नुकसान भरपाई यासाठी सभागृहात आवाज उठविला पाहीजे परंतु हे न करता ते शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टिका करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात विष कालवणे आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांवर अमानवीय पद्धतीने लाठीचार्ज केला. हा लाठीमार करायला लावणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्धवस्त करण्यासाठी आता बळीराजा सज्ज झाला आहे. आमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. शेतकऱ्यांसाठी तुरुंगात काय फासावर पण जायला आम्ही तयार आहे. पिकविमा, नुकसान भरपाई आणि शेतमालाला दरवाढ मिळावी यासाठी आपला लढा सुरुच राहील, अशी ग्वाही तुपकर यांनी दिली. आंदोलनातून जिल्ह्यातील २ लाख १ हजात ६११ शेतकऱ्यांच्या पदरात १५८ कोटी रुपये पिकविमा पाडू शकलो याचे समाधान आहे. तसेच जलसमाधी आंदोलनामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १७४ कोटी रुपये मंजूर झाले आहे, परंतु ते देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ती रक्कम देण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे, असेही यावेळी तुपकरांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी कितीही डावपेच आखले तरी आता शेतकरी त्यांची चाल ओळखून आहे. शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा हिसका दाखवा आणि सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन यावेळी तुपकरांनी केले.


  यावेळी 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, बबनराव चेके, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, सहदेव लाड, राम अंभोरे, मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकार, वसंतराव पाटील, गणेश शिंगणे, अंकुश सुसर, अनिल बोरकर, गणेश गारोळे, देवा आखाडे, दिपक बंसोडे, विवेक ठाकरे तसेच माजी सभापती गजानन बंगाळे, गावच्या सरपंच ज्योतीताई सावळे, पोलीस पाटील लक्ष्मण जायभाये, सभापती गजानन बंगाळे, मा.सरपंच विठोबा मांटे, मा.सरपंच अविदास बंगाळे, मा.उपसरपंच बबन जायभाये, शे. संघटना आत्माराम गाडे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सिकंदरखॉं पठाण, आत्माराम बंगाळे, मदन बंगाळे, प्रल्हाद काळूसे, भास्कर आंधळे, गजानन काळे, शेरखॉं पठाण, जगन्नाथ बंगाळे, समाधान गाढे, सतीश काळूसे, रामकिसन काळे, गजानन बंगाळे, हनुमान काळे, गणेश कणखर, संतोष साबळे, विजय डोंगरे, पुरुषोत्तम बंगाळे, राजू जायभाये, ज्ञानेश्वर मानतकर, गणेश बंगाले, अमोल बंगाळे, समाधान कणखर, विनोद बंगाले, शेख मुक्तार, फिरोजखॉं पठाण, जगन सावळे, अमोल तुपकर यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

ही तर नव्या राजकीय पर्वाची सुरुवात - दामूअण्णा इंगोले

दरेगाव येथील हा मेळावा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात आहे. रविकांत तुपकर नावाचे वादळ आता जिल्हाभर पोहचविण्याचे काम आम्ही करणार आहे, असे यावेळी बोलतांना 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी जिवाची पर्वा न करता लढत राहणाऱ्या नेत्याला जिल्हाभरातून शेतकरी, कष्टकऱ्यांचे मिळणारे आशिर्वाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शेतकऱ्यांची ही तोफ आता लोकसभेत पाठविण्यासाठी कार्यकर्ते आता पेटुन उठले आहेत, असे यावेळी इंगोले यांनी सांगितले.