संग्रामपुरात वन बुलडाणा मिशनचा महिला मेळावा गाजला!
संदीप शेळके म्हणाले महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबध्द! जिल्ह्याच्या विकासात मातृशक्तीची भागीदारी वाढवणार;सोनाळ्याची सभाही ठरली लक्षवेधी...
Updated: Feb 23, 2024, 14:53 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा काल २२ फेब्रुवारीला संग्रामपूर तालुक्यात दाखल झाली. महिला मेळावा व बाईक रॅली काढत संग्रामपूर तालुक्यातील ७० गावांचा प्रवास करण्यासाठी यात्रा पुढे मार्गस्थ झाली. मागील बारा दिवसात यात्रेने मोताळा, शेगाव तालुका पिंजून काढला. संग्रामपूर येथे झालेल्या महिला मेळावा अक्षरशः गाजला. प्रचंड प्रतिसादासह गाजलेल्या या मेळाव्यात महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे वचन संदीप शेळके यांनी दिले.
![Gdh](https://buldanalive.com/static/c1e/client/91497/uploaded/d2221e80998ce31b4a70df899a6f8bac.jpg)
महिलांच्या अनेक समस्या तर आहेच पण सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्यात बेपत्ता महिलांचे सर्वाधिक प्रमाण आहे, दिवसाला विवाहित महिला, अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना आपण ऐकून आहोत .आर्थिक व कुटुंब विवंचनेत असलेल्या महिलांसाठी आधार बनणे सध्या गरजेचे आहे, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर केल्या तर नक्कीच विपरीत घडणाऱ्या घटनांना आळा बसू शकतो. आर्थिक दृष्ट्या महिलांना मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागात बचतगटांची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणींसाठी स्वतंत्र अभ्यासिका असली पाहिजे, गाव खेड्यात स्वच्छतागृह बांधली पाहिजे, महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य विभागाचे समुपदेशन केंद्र असले पाहिजे या सर्व समस्या दुर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे शेळके म्हणाले. जिल्ह्याच्या विकासात मातृशक्तीची भागीदारी वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.
![सस](https://buldanalive.com/static/c1e/client/91497/uploaded/0cd3492da76689c8a8fac7a8b74937f3.jpg)
बाईक रॅलीत शेकडो युवकांचा सहभाग..
दरम्यान वन बुलढाणा मिशनचे वतीने संग्रामपूर ते सोनाळा अशी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. तसेच सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू झाले पाहिजे, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे, सोयाबीन कापसाला भाव कधी मिळणार? अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते.
![Ran](https://buldanalive.com/static/c1e/client/91497/uploaded/df65b90a2e4cd1eadc595197c366ece7.jpg)
सोनाळ्यात दमदार सभा..!
सायंकाळी सोनाळा येथील परिवर्तन रथयात्रेच्या सभेत जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक दूर करणार असा विश्वास भाषणातून संदीप शेळके यांनी व्यक्त केला .
ते म्हणाले, ७६ वर्षे उलटली गेली तरी बुलढाणा जिल्ह्याला मागासलेपणाचा कलंक कायम आहे. तो कलंक कायमचा पुसणार आणि जिल्ह्याचा कायापालट करणार, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास नेमका कसा करायचा याची ब्ल्यू प्रिंट आपल्याजवळ तयार आहे असेही संदीप शेळके म्हणाले. जिल्ह्यात तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी असणे हा विषय आपल्या अजेंड्यावर असल्याचे संदीप शेळके यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला २४ तास वीज आणि पाणी मिळावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर येणाऱ्या काळात आपला भर राहील. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गटशेतीसाठी प्रोत्साहित करून शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतमाल निर्यात कसा करता येईल यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. १० फेब्रुवारीपासून काढलेल्या परिवर्तन रथयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून जनतेने आता विकासासाठी परिवर्तनाचा निर्धार केल्याचेही संदीप शेळके शेवटी म्हणाले.