याला "पांचटपणा" म्हणतात! आधी स्वबळावर निवडणूक लढायची घोषणा केली अन् शेवटच्या दिवशी सगळे अर्ज मागे घेतले! लोणार भाजपवाल्यांवर प्रेशर कुणाचं?

 
भाजपा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राणा भीमदेवी थाटात स्वबळावर निवडणुक लढवण्याची घोषणा करायची, आतापर्यंत आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला विश्वासात घेतले नाही अशा बाता हाणायच्या अन् शेवटी करायचा तो "पांचटपणा"..! शिवसेनेने लोणारात वाढुच न दिलेल्या भाजपचा हा कारनामा..  लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून भाजपने दाखल केलेले सर्वच उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतलेत. त्यामुळे  स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या लोणार भाजपवाल्यांवर कुणाचं प्रेशर आल? या प्रश्नांची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
 

gode

                                                                                             (  जाहिरात  )

 लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारीनंतर आता १८ जागांसाठी   ३९ उमेदवार रिंगणात असल्याचे वृत्त आहे. शिंदेची शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना इथे होईल. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने मात्र लोणार मध्ये वेगळी भूमिका घेतली होती.खासदार प्रतापराव जाधवांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आम्हाला "ते" विश्वासात घेत नसल्याचा आरोप भाजपने केला. आतापर्यंत आमचा केवळ उपयोग करून घेतला ,त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढायची...आपली ताकद दाखवून द्यायची.. असा सूर लोणार भाजपच्या बैठकीत उमटला. भाजपच्या वतीने अर्जही दाखल करण्यात आले. मात्र आज २० एप्रिलला सर्वच भाजप उमेदवारांनी अर्ज सपासप मागे घेतल्याने भाजपने निवडणुकीतून पळ काढल्याचे बोलल्या जाऊ लागलेय.
     
 स्वबळावर निवडणुक लढवायची घोषणा करूनही भाजपची शिंदेच्या शिवसेनेशी बोलणी सुरूच होती असेही आता समोर आलेय. खुद्द लोणार भाजपच्या नेत्यांनीच कॅमेऱ्यासमोर आज तसे बोलून दाखवले. आमदारांशी आम्ही बोललो ,त्यांनी काही जागा द्यायचे कबूल केले मात्र शेवटी शब्द पाळला नाही असे आता लोणार भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही आता तटस्थ आहोत अशी भूमिका त्यांनी घेतलीय. एकीकडे स्वबळावर लढणार म्हणायचे, आतून बोलणी करायची अन् शेवटच्या दिवशी माघार  घ्यायची याला पांचटपणा म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? कुणाचे तरी प्रेशर(धमकी?) आल्याशिवाय खरच अर्ज मागे घेतले असते का? अशी दबक्या आवाजातली चर्चाही आता लोणार मध्ये रंगणार आहे.