प्रचंड विक्रमी ठरली मेहकरतील सभा; प्रचार रॅलीही ठरली रेकॉर्डब्रेक; रविकांत तुपकर म्हणाले,दादागिरी,कमिशनराज संपवून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणार..

 
मेहकर
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कमिशन राज, दादागिरी आणि एकाधिकारशाहीला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आता पेटून उठली आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा सामना आहे. प्रत्येक घटकातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद पाहता या लढाईत विजय हा जनशक्तीचाच होणार आहे. आता एकजूट होऊन दादागिरी कमिशन राज संपवून जनसामान्यांचा आवाज बुलंद करू, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी मेकर येथे झालेल्या विराट सभेत बोलतांना केले.  
मेहकर शहरात आज १९ एप्रिल रोजी रविकांत तुपकर यांची रेकॉर्डब्रेक प्रचार रॅली निघाली. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण अशा सर्वच समाज घटकातील नागरिक या प्रचार रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, मेहकर आणि लोणार मध्ये गेली तीस वर्षे एक हाती सत्ता आहे. केंद्रात आणि राज्यातही यांची सत्ता आहे परंतु साध्या बस स्थानकाची देखील सुधारणा हे करू शकले नाही. बस स्थानकावर महिलांसाठी प्रसाधन गृह देखील नाही. अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा आहे, सिंचनाचा अभाव आहे, एवढ्या वर्षात एखादी चांगली मोठी एमआयडीसी येथे सुरू होऊन युवकांना रोजगार मिळायला हवा होता, परंतु तसे काहीच झाले नाही. ठेकेदारी घरातच, देवस्थानांच्या, मंदिरांच्या व इतरांच्या जमिनीही त्यांनी हडप केल्या. पंधरा वर्षात मेहकर मतदारसंघात सोबतच संपूर्ण जिल्ह्याचे वाटोळा करण्याचं काम यांनी केले आहे. आमच्यावर शेकडो केसेस केल्या, पोलिसांना लाठीमार करायला लावला, आम्हाला तुरुंगात टाकले, रविकांत तुपकर गुन्हेगार आहे म्हणून वर्षभर त्याला तुरुंगात ठेवावे, अशी मागणी केली, परंतु आमची चूक तरी काय आहे. सोयाबीन-कापसाला भाव मागणे, पिकविमा मागणे, नुकसान भरपाई मागणे, तरुणांना रोजगार मागणे, महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्याची मागणी करणे, सर्वसामान्यांसाठी लढणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणे हा आमचा गुन्हा आहे का, असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या संघर्षाची मजुरी म्हणून एक मत द्या, असे आवाहन केले. 
Advt
 Advt 👆
मी कोणत्याही पदावर नसतांना केवळ आंदोलनाच्या बळावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. तुमच्या सर्वांचे आशीर्वादाने जर संसदेत गेलो तर सोयाबीन-कापसाच्या भावासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संपूर्ण ताकदीने लढेल. ही लढाई एकटी रविकांत तुपकरची नाही तर ही लढाई आता सर्वसामान्य जनतेची आहे. रविकांत तुपकर खासदार म्हणजे प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि प्रत्येक फटका माणूस खासदार होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे आहात असे समजून प्रचाराचे काम करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. आता प्रत्येकाच्या मनामनात परिवर्तनाचा विचार आहे, घरची चटणी भाकर खाऊन या जिल्ह्यात परिवर्तनाची क्रांती घडवून दाखवू असा विश्वास यावेळी उपस्थित त्यांनी प्रचंड नारबाजीच्या माध्यमातून रविकांत तुपकारांना दिला.