रविकांत तुपकर समर्थकांचा प्लॅन ठरला! बुलडाणा शहरात पार पडली समर्थकांची उत्स्फूर्त बैठक;

२ एप्रिल रोजी तुपकर दाखल करणार लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज ; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन...
 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे आज रविकांत तुपकरांच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थकांची रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत अतिशय जोशपूर्ण वातावरणात बैठक पार पडली. बैठकीला असलेल्या समर्थकांच्या भरगच्च गर्दीने कोणत्याही परिस्थितीत 'लढायचं आणि जिंकायचं' असा निर्धार केला. येत्या दि. २ एप्रिल रोजी शेतकरी, कष्टकरी,तरुण व सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी रविकांत तुपकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या दिवशी होणारी सभा हीच आपली मुख्य सभा असणार आहे. त्यामुळे या सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 'धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' अशा होणाऱ्या लढाईत सहभागी होवून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी केले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकर, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून २ एप्रिल अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी २३ मार्च रोजी बुलढाणा तालुक्यातील सातगाव येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात केली होती.शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर गेल्या २२ वर्षांपासून लढा देत आहेत, आजवर त्यांनी या प्रश्नावर अनेकवेळा तृरूंगवास भोगला आहे, तडीपारी भोगली, पोलिसांचा लाठीमार सहन केला. त्यांच्या या लढ्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात नेहमीच काही न काही पडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत रविकांत तुपकर यांना साथ देण्याचा चंग सर्वसामान्य जनतेने बांधला आहे. तुपकर जेथे जातील तिथे त्यांच्या सभांना नागरिकांची प्रचंड गर्दी होते, सध्या जिल्ह्यात तुपकरांची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जर जनताच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर आपल्या कशाची भीती त्यामुळे आता ताकदीने लढायचं आणि जिंकायचं..! असा निर्धार आज गोलांडे लॉन्स येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांनी केला. 
यावेळी रविकांत तुपकरांनी उपस्थितांना संबोधित करतांना आपण शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहास्तव निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असून त्यांच्याच आशीर्वादाने २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा हीच आपली मुख्य सभा आहे, त्यामुळे या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून 'धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' या होणाऱ्या परिवर्तनाच्या लढाईला पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर निवडणूकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बाबींवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.