चिखली तालुक्यात रविकांत तुपकरांचे ठिकठिकाणी सत्कार!

आंदोलनामुळे पिकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव
 
Rt
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यामुळे शेतकरी रविकांत तुपकर यांच्यावर सत्काराचा वर्षाव करीत आहेत. चिखली तालुक्यात तर गावोगावी सत्काराची मालिकाच सुरु झाली आहे.
  चिखली तालुक्यातील शेलोडी, पिंपरखेड, कारखेड, धानोरी, सातगाव भुसारी व सोनेवाडी या गावांमध्ये नुकताच रविकांत तुपकरांचा सत्कार पार पडला. ग्रामस्थांनी रविकांत तुपकर यांची गावातून मिरवणूक काढुन त्यांचा नागरी सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, गुलाबपुष्पांचा मोठा हार, फुलांची उधळण अशा स्वरुपात शेतकरी रविकांत तुपकर यांचे स्वागत आणि सत्कार करीत आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे प्रेम, आशीर्वाद लढण्यासाठी बळ देतात. आज जरी सत्कार होत असले तरी हे सत्कार उद्याच्या जबाबदारीची जाणीव करुन देणारे आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी शेतकरी चळवळीला आपले पूर्ण समर्पण आहे, अखेरच्या श्वासापर्यंत आपण शेतकऱ्यांसाठी लढत राहू, अशी ग्वाही रविकांत तुपकर यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.      
         यावेळी 'स्वाभिमानी'चे नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत, ॲड. राज शेख, मोहम्मद अझहर, रामेश्वर अंभोरे, सुधाकर तायडे, गजानन देशमुख, अंकुश सुसर, इलीयास सौदागर, संतोष शेळके, अंबादास मोरे अशोकजी राऊत, शरद राऊत, नारायण अंभोरे, बंडू अंभोरे, बालू कणखर, गणेश कणखर, विजय राऊत, दिपक राऊत पुरुषोत्तम तवर, दिलीप राऊत, राहुल राऊत यांच्यासह सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, महिला वतरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रुटीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही पिकविमा जमा होण्यास सुरुवात
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पिकविमा बँक खाते क्रमांक व आय.फ.एस.सी. कोड चुकल्यामुळे अडकून पडला होता, त्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळण्यासाठी तुपकरांचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. रविकांत तुपकरांनी दि.१९ जून रोजी कृषि अधीक्षकांच्या दालनात धडक देत त्रुटी मध्ये असलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याची मागणी लावून धरली, तसेच दि.२० जून रोजी ही 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी चिखली तालुका कृषि कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर दि.२६ जून पासून त्रुटी मध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर उशिरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या, १००० पेक्षा कमी रक्कम मिळालेल्या व कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना तफावत रक्कम मिळावी, यासाठी लढाई चालूच राहील असे तुपकरांनी स्पष्ट केले आहे.