POLITICAL SPECIAL रविकांत तुपकरांचे राजू शेट्टी व शिस्तपालन समितीस विस्तृत पत्र; लिखित स्वरूपात मांडली व्यथा! समितीच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष..

 
Tupkar
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)::स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांना संघटनेच्या शिस्तपालन समितीने १५ ऑगस्ट रोजी पर्यंत समिती समोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यासाठीचा अवधी दिला होता. रविकांत तुपकर समिती समोर प्रत्यक्ष हजर झाले नसले, तरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी तसेच शिस्तपालन समिती यांना सविस्तर असे पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून आपल्या व्यथा, आक्षेप त्यांनी सविस्तरपणे व्यक्त केले आहेत. आता रविकांत तुपकर यांनी या पत्रात मांडलेल्या आक्षेपांवर शिस्तपालन समिती काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रविकांत तुपकर यांनी शिस्तपालन समितीसमोर येऊन आपले म्हणने मांडावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने सांगितले होते. तुपकर आपले म्हणने मांडतात की नाही? याबाबत चर्चा रंगत होती. राजू शेट्टी यांना आपण ४-५ वर्षांपासून आपले म्हणणे वारंवार सांगत आलेलो आहे. शिवाय शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे. वारंवार तेच ते म्हणणे कितीवेळा मांडू...? असे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच म्हटले आहे. 

त्यानुसार ते शिस्तपालन समितीसमोर गेले नाही. त्यानंतर तुपकरांना समितीने वाढीव अवधी देत १५ ऑगस्ट पर्यंत म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. परंतु रविकांत तुपकर त्या कालावधीत देखील शिस्तपालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. तुपकर  यांनी राजू शेट्टी यांना तसेच शिस्तपालन समितीला ९ ते १० पानांचे सविस्तर पत्र दिल्याची माहिती आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडींचा व संघटनेच्या  कार्याचा  उल्लेख आहे. शिवाय  संघटनेची विविध आंदोलने आणि या आंदोलनातून तुपकरांसह  त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडीपारी, तुरुंगवास  असा एकंदरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीचा  आणि राजकीय प्रवास याबद्दल  पत्रात उल्लेख असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना या पत्रातून मांडण्यात आल्याचे समजते.  

 प्रत्येक निवडणुकीत राजू शेट्टी यांची भूमिका कशी बदलत राहीली आणि त्यातून तुपकरांसह इतर धडाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कसा अन्याय झाला हे देखील त्या पत्रात नमुद आहे. गत चार ते पाच वर्षांपासून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला रोष तुपकरांनी मांडला असून संघटनेच्या कार्यपद्धतीवर असलेला आक्षेप यासह इतर बाबी पत्रात नमूद असल्याचे कळते. ९ ते १० पानांच्या पत्रात  नेमके कोणते कोणते आक्षेप तुपकरांनी या पत्रात मांडले हे कऴू शकले नाही, मात्र ९ ते १० पानांच्या या पत्रात बरेच काही नमुद असल्याचे कळते. संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिस्तपालन समितीकडे तुपकर यांनी मांडलेल्या आक्षेपांवर शिस्तपालन समिती आता काय कारवाई करणार, रविकांत तुपकर आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या संघटनेतील कार्यपद्धतीबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा कसा करणार यासह राजू शेट्टी व शिस्तपालन समिती नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.