महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम राजभवनात घेता आला असता! खारघर मध्ये घेतलेला कार्यक्रम राजकीय फायद्यासाठीच;

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा आरोप! म्हणाले, १३ कोटी रुपयांचा खर्च केला मग सामान्य श्री भक्तांना साधा पेंडॉल टाकता आला नाही का? सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

 
jjv
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १६ एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना खारघर मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. लाखो श्री भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरकारने या कार्यक्रमासाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च केले. व्हीआयपी लोकांसाठी स्टेजवर एसी, कुलर लावण्यात आले. स्टेजच्या मागे शाही शामियान्यात नेत्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मात्र एप्रिलच्या कडक उन्हात तळमळत बसलेल्या श्री भक्तांसाठी साधा पेंडॉल सरकारला टाकता आला नाही, पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करता आले नाही. याआधी झालेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमा प्रमाणे हा कार्यक्रम सुद्धा शासकीय पातळीवर राजभवनात घेता आला असता मात्र  सरकारकडून या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमात उष्माघाताने बळी झालेल्यांची शासकीय संख्या १५ दाखवल्या जात असली तरी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या ५० असू शकते. असा दावा करीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी श्री भक्तांच्या मृत्युसाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. सरकारवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा. या संदर्भात चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार धिरज लिंगाडे, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके, श्याम उमाळकर यावेळी उपस्थित होते.
 

महाराष्ट्रभूषण कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचे काम भाजपने केले. १३ कोटी रुपयांचा खर्च शासकीय तिजोरीतून केला मग साधे कपड्याचे छत देखील श्री.भक्तांसाठी टाकता आले नाही का ? असा सवाल यावेळी राहुल बोंद्रेंनी केला. कार्यक्रम नियोजन शून्य होता, शाही व्यवस्था केवळ व्हीआयपी लोकांची होती. उन्हामुळे अनेकांना भोवळ आली, रुग्णवाहिकांचे सायरन वाजत होते मात्र स्टेजवरील लोकांना त्याचे काहीची सोयरसुतक नव्हते असेही राहुल बोंद्रे म्हणाले. शासन सांगत असलेला १४ बळींचा आकडा खोटा आहे, ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरी झाली मात्र त्याही बातम्या दाबण्यात आल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. या बळींची संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे, याची चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात दोन दिवसांचे विशेष अधिवेशन झाले पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली, आम्हीही तीच मागणी करीत आहोत असे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जो पुरस्कार दिला त्याचे राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले.