थोड्याच वेळात तुपकरांचा ताफा मुंबईकडे निघणार! तुपकारांची तब्येत खालावली तरी मंत्रालयाचा ताबा घेण्याच्या भूमिकेवर ठाम; सोमठाण्यात एकवटत आहेत जिल्हाभरातील शेतकरी;
तुपकरांच्या आंदोलनाला संदीप शेळकेंचाही पाठिंबा; म्हणाले राजकारण बाजूला, शेतकरी महत्वाचा...
Nov 28, 2023, 10:24 IST
सोमठाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे २५ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज,२८ नोव्हेंबरला अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तुपकर मुंबईकडे मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी निघणार आहेत. उद्या, २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली आहे.
जिल्हाभरातून शेतकरी सोमठाणा येथे दाखल होत आहेत. थोड्याच वेळात तुपकरांचा ताफा सोमठाणा येथून निघून बुलडाणा येथे स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे पोहचणार आहे. त्यानंतर हजारो शेतकऱ्यांसह तुपकर मुंबईकडे रवाना होणार आहेत..
संदीप शेळके यांचा पाठिंबा...
![Ss](https://buldanalive.com/static/c1e/client/91497/uploaded/92f33e2f1f6f6f7923e9fe4c679b44c6.jpg)
वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी सोमठाणा येथे येवून रविकांत तुपकर यांची भेट घेतली. सोयाबीन ,कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहिले पाहिजे असे संदीप शेळके प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. तुपकर यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे संदीप शेळके म्हणाले.