आनंदाची बातमी! साखळी बु येथील आरोग्य उपकेंद्राचे आता प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणीवर्धन; आमदार श्वेताताईंनी विषय लावला मार्गी

 
Sweta mahalle
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बऱ्याच काळापासून साखळीवासियांची प्रमुख मागणी असलेला साखळी आरोग्य उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे ही मागणी आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नामुळे निकाली निघाली असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार साखळी येथील आरोग्य उपकेंद्राचे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता मिळाल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आले आहे. त्यामुळे आता साखळीसह सव, येळगाव, रुईखेड टेकाळे व अंत्री तेली या गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार होण्यास मदत होणार आहे. 
 साखळी हे गाव वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असल्याने ते गैरसोयीचे होते. ही बाब स्थानिक रहिवाशांनी आ. श्वेताताई महाले यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आ. महाले यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साखळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आ. श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. या निवेदनाची राज्य शासनाकडून गंभीरपणे दखल घेण्यात आली असून आरोग्य विभागाकडून आ. महाले यांच्या मागणीचा विचार करत करत कार्यवाही करण्यात आली. दि. ९ नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागने काढलेल्या परिपत्रकात साखळी येथे नवीन आरोग्य केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. 
                  चिखली मतदारसंघात समाविष्ट असलेले बुलढाणा तालुक्यातील साखळी गाव जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव असून हे व इतर आसपासची गावे वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गात येतात. भौगोलिक दृष्ट्या वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र हे साखळी बु , येळगाव, रुइखेड टेकाळे, सव, अंत्री तेली या गावांसाठी गैरसोयीचे आहे. या गावातील नागरिकांना वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी बुलडाणा शहरात येऊन वरवंडला जावे लागत असे. साखळी हे गाव मोठे असल्याने तेथील आरोग्य उपकेंद्र नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपुरे पडत होते तसेच साखळी ते वरवंड हा अतिशय मोठा फेरा असून त्यामुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आता संबंधित गावांमधील लोकांचा हा त्रास वाचला असून आरोग्य सुविधा गरजू लोकांपर्यंत जलद गतीने पोहचण्यास देखील मोठी मदत होणार आहे.