विकसित भारतासाठी, नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांना मत द्या! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा यांचे आवाहन; वरवट बकाल येथे पार पडली सभा;

ना गुलाबराव पाटलांचे भाषणही झाले वादळी! आ.संजय कुटे म्हणाले, प्रतापरावांना लीड देण्यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा..

 
Hhvv

संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. १० वर्षाआधी आम्ही ११व्या क्रमांकावर होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्यांनी आमच्यावर १५० वर्षे राज्य केले त्या ब्रिटिशांना देखील मागे सोडले. पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांना मतदान करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवल्यानंतर २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. देशात स्थिर आणि पूर्ण बहुमतातील सरकार असल्यावर काय परिवर्तन होऊ शकते हे देशातील जनतेने १० वर्षात अनुभवले आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना विजयी करा असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले. खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर यावेळी मंचावर महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचेसह ,राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे, आ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुख संचेती , माजी आमदार धृपदराव सावळे, योगेंद्र गोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, सचिन पाटील यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

   पुढे बोलतांना जे.पी.नड्डा म्हणाले की, नरेंद्र मोदी देशाचे यशस्वी पंतप्रधान आहेत, आपल्या आशीर्वादाने ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत. प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत बनवण्याचा संकल्प करणारी ही निवडणूक आहे असे ते म्हणाले.नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची व्याख्या बदलवून टाकली. भारताचे राजकरण आता जबाबदारीचे राजकारण झाले आहे, व्होट बँकेच्या राजकारणाला विकासासाच्या राजकारणात परावर्तित करण्याचे काम मोदींनी केल्याचे ते म्हणाले. जनतेने २०१९ मध्ये बहुमताने सरकार दिले म्हणून  कलम ३७० ला धाराशायी केल्याचे ते म्हणाले. तीन तलाक, राम मंदिर निर्माण, सीएए या मुद्यांवर देखील नड्डा यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मजुबुत निर्णय घेतले. देशातील २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आल्याचे ते म्हणाले. 

   देशातील १० कोटी महिलांना उज्वला गॅस कनेक्शन  दिल्याचेही नड्डा यांनी सांगितले. हर घर नल योजनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात ७० लाखांवर नळ दिल्याचे ते म्हणाले. 

४ कोटी घरे दिली, पुन्हा ३ कोटी घरे देणार ..

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशात ४ कोटी घर देण्यात आले आहे. प्रतापराव जाधवांना पुन्हा विजयी करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान केल्यानंतर पुन्हा ३ कोटी घरे देण्यात येणार असल्याचेही नड्डा म्हणाले. भारत आज ५ व्या नंबरची अर्थव्यवस्था बनला आहे, दहा वर्षांपूर्वी आम्ही ११ व्या नंबरची अर्थव्यवस्था होतो. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा दावा यावेळी जे.पी.नड्डा यांनी केला. देशात हजारो किलोमीटरचे रस्ते बनले आहेत, देशात रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. बुलडाण्यासारख्या छोट्या शहरात वैद्यकीय महाविद्यालय होत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी परिवारवाद, भ्रष्टाचार या मुद्यांवरून विरोधी आघाडीवर टीकास्त्र केले. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. आमची लढाई देशाला पुढे नेण्याची तर विरोधकांची स्वतःच्या परिवाराला वाचवण्याची लढाई असल्याचे ते म्हणाले. प्रतापराव जाधव यांनी विकासासाठी मोठे काम केले आहे, २६ तारखेला पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचे आवाहनही नड्डा यांनी केले. 


देशाच्या अस्तित्वाची निवडणूक: ना.गुलाबराव पाटील

ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. देशात जे ५४४ उमेदवार आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, इथे प्रतापराव जाधव उमेदवार नसुंन नरेंद्र मोदी उमेदवार आहेत असे समजून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. देश सर्वतोपरी ही आमची विचारधारा आहे, देश नरेंद्र मोदी यांच्याच हातात सुरक्षित आहे असे ना.पाटील म्हणाले. २६ तारखेला प्रतापराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन ना .पाटील यांनी केले.

खा. प्रतापराव जाधव म्हणाले,

यावेळी बोलतांना खा.प्रतापराव  म्हणाले की, गेल्या १० वर्षात बुलडाणा जिल्ह्याचा विकास ज्या गतीने झाला तो आपल्या समोर आहे.सर्वच रस्ते काँक्रीटीकरण झाले आहे. जिल्ह्यात ५४ हजार कोटी रुपयांचा समृध्दी महामार्ग पूर्ण झाला. खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि आणि राज्य सरकारने ५० -५० टक्के निधी मंजूर केला आहे. ८८ हजार कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. १९८ गावात मोबाईल नेटवर्क नव्हते आता त्या गावांमध्ये आपण टॉवर बसवल्याचे ते म्हणाले. "आता पुन्हा चौथ्यांदा महायुतीची उमेदवारी मला दिली, २६ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटन दाबून सेवेची संधी द्यावी" अशी विनंतीही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.संजय कुटे यांनी केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,  वरवट बकाल सारख्या एका छोट्याश्या गावात राष्ट्रीय अध्यक्षांचे येणे हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. ६ मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे प्रतापराव जाधव यांना सर्वात जास्त लीड कोण देतो अशी स्पर्धा आमदारांमध्ये लागली असल्याचे ते म्हणाले. २६ एप्रिल लग्नाची तारीख आहे, मात्र आधी मतदान करून लग्नसमारंभात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली त्यांच्या उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत पराभव झालाच पाहिजे असेही आ.कुटे म्हणाले.