रविकांत तुपकरांसाठी शेतकऱ्याचे असेही व्रत! अनवाणी पायाने गणेश कदम दररोज करतात भादोला ते बुलडाणा पायी वारी; तुपकरांच्या विजयासाठी आई जगदंबेला साकडे...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वसामान्य जनतेचा उमेदवार रविकांत तुपकर यांच्यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी वेगवेगळे संकल्प आणि वेगवेगळे व्रत घेतले आहेत. यातीलच एक असलेल्या भादोला येथील गणेश कदम या शेतकऱ्याने आपल्या नेत्याच्या विजयासाठी अनोखे व्रत घेतले आहे. अनवाणी पायाने भादोला ते बुलडाणा अशी दररोज पायीवारी करून ते जगदंबा मातेला साकडे घालत आहेत.
कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार रविकांत तुपकर यांना जिल्हाभरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. तुपकर यांच्या प्रचारासाठी हजारो चाहते आणि कार्यकर्ते स्वखर्चाने घरची चटणी भाकर खाऊन फिरत आहेत. तर अनेक चाहत्यांनी वेगवेगळे संकल्प आणि वेगवेगळे व्रत देखील अंगीकारले आहेत. आपला नेता विजयी झाल्या शिवाय चप्पल घालणार नाही, दररोज एक वेळेस उपास करणार , काही मुस्लिम भगिनींनी रविकांत तुपकरांसाठी रोजे पकडले तर काही पोथी वाचन करीत आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेने आणि भक्तीने तुपकरांसाठी व्रत करत आहेत.  
भादोला येथील शेतकरी गणेश कदम हे देखील जगदंबा मातेचे भक्त आहेत. रविकांत तुपकर यांचा लोकसभेत विजय व्हावा यासाठी त्यांनी देवीला साकडे घातले आहे. ज्या दिवशी रविकांत तुपकरांनी लोकसभेचा अर्ज भरला त्या दिवशीपासून तर मतदानाच्या दिवशी पर्यंत दररोज भादोला ते बुलढाणा अनवाणी पायांनी चालत येत तुपकरांच्या विजयासाठी देवीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करायची असा नित्यक्रम ते दररोज करत आहेत. भादोला ते बुलढाणा हे किमान दहा ते बारा किलोमीटरचे अंतर दररोज सकाळी अनवाणी पायाने पायी चालून यायचे आणि देवीच्या मंदिरात दर्शन घ्यायचे व परत भादॊला जायचे असा नित्यक्रम गणेश कदम करत आहेत. या पाई वारी बाबत गणेश कदम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "रविकांत तुपकर हे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर यांनी आजवर हजारो आंदोलने केली आहेत. सर्वसामान्यांसाठी जीवाची बाजी लावणारा नेता म्हणजे रविकांत तुपकर आहे. सोयाबीन कापूस व शेतमालाला भाव पाहिजे असेल तर रविकांत तुपकर यांना दिल्लीला पाठवणे गरजेचे आहे, म्हणून रविकांत तुकाराम साठी आपण हे व्रत करत आहोत".