Amazon Ad

BULDANA LIVE SPECIAL "मै अकेला चला था जानिबे मगर...लोग आते गये कारवा बनता गया"; मादनी ते दिल्ली व्हाया मुंबई; भूमिपुत्रावर आता देशाची जबाबदारी!

वाचा खा. प्रतापराव जाधव यांची सक्सेस स्टोरी! राजकारणातील प्रवेशापासून तर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत....
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ :  बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील मादनी या छोट्याशा खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या खा.प्रतापराव गणपतराव जाधव यांच्या नावासमोर आज,९ जूनच्या संध्याकाळनंतर नामदार लागणार आहे. खा.जाधव यांचा हा प्रवास काही साधासुधा आणि सोपा नव्हता..मात्र अनेक आव्हानांवर मात करीत खा.जाधव सलग तीनदा आमदार आणि सलग चौथ्यांदा खासदार झाले. आज सायंकाळी खा.प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ही वार्ता जिल्हाभरात पसरतात सगळीकडे आनंदोत्सव आहे, जिल्ह्याच्या भूमिपुत्राची वर्णी आता थेट दिल्लीच्या तख्तावर लागणार असल्याने जिल्ह्यात सगळीकडे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खा. प्रतापराव जाधव यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा खास "बुलडाणा लाइव्ह' च्या वाचकांसाठी....
  Advt
Advt.👆
कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या जीवन प्रवासाची सुरुवात सहसा सामान्य पद्धतीनेच होते. दुरगामी परिवर्तन, क्रांती मग ती सामाजिक असो वा राजकीय असो त्याची सुरुवात देखील अशीच वयक्तिक पातळीवरच होते. इतिहासाचा वा अलीकडच्या काळातील प्रसिद्ध, यशस्वी व्यक्ती, परिणामकारक घडामोडींचा आढावा घेतला तर हीच बाब सिद्ध होते. राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातही अशा व्यक्ती वा व्यक्तिमत्वाची वानवा नाही. तीनदा दिल्ली व तीनदा मुंबई सर करणारे खासदार प्रतापराव जाधव याचे एक मासलेवाईक उदाहरण ठरावे..!  ८० च्या दशकात राजकारण व समाजकारणाच्या अथांग महासागरात पोहण्याचा सराव करणाऱ्या गणपतराव जाधव या शेतकऱ्याचा मुलगा अशीच केवळ त्यांची ओळख होती. त्यामुळे हा मर्द मावळा काही वर्षांनी राजकारण गाजवेल, नव्हे तर कधी न पाहिलेली मुंबई एकदा नव्हे तीनदा गाठेल, नुसतीच मुंबई नाही तर विधानसभेत जाईल, मंत्री होईल असे भाकीत कोणी वर्तवले असते तर त्याला सर्वांनी वेड्यात काढले असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा भगवा ४ वेळेस लोकसभेवर फडकवेल असे चुकून सांगितले असते तर सांगणाऱ्याची  वेड्यांच्या इस्पितळात रवानगी करायला देखील कुणी मागे पुढे पाहिले नसते. मात्र मेहकर तालुक्यातील मादणी येथील या युवकाने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बेताची परिस्थिती असताना हा राजकीय चमत्कार घडविला. तेव्हाचा हा  "प्रतापी" युवक आज नुसताच खासदार नसून जिल्ह्याचे राजकारण करणारा, अनेकांचे राजकारण घडवणारा आणि अनेकांचे राजकारण  बिघडवणारा महानेता बनला आहे.बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणारा शिवसैनिक, लाखो शिवसैनिकांचा सेनापती, सर्व सामान्यांचा लाडका नेता. आपल्या झंझावाताने भल्याभल्या नेत्यांना पालापाचोळ्यासारखे भिरकावून पराभूत करणारा अजिंक्य वीर ठरला आहे. मात्र यासाठी त्यांनी अनेक वर्ष घरादारावर तुळशीपत्र ठेवत राजकारण, मतदारसंघ पिंजून काढत निष्ठावान मावळ्यांची फौज उभारली.  जनसामान्यांच्या समस्यांसाठी संघर्ष उभारला, प्रस्थापित नेत्यांशी दोन हात केले. घर कुटुंब विसरून शिवसेनेलाच आपला परिवार तर शिवसैनिकांना आपले सोयरे मानले. 
Alal
 Advt.👆
असा आहे प्रवास..
राज्यातील राजकारण संक्रमण अवस्थेत असताना ८० चे दशक संपत असताना प्रतापराव जाधव नामक युवकाने खांद्यावर भगवा घेतला. प्रारंभीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर मतदारसंघात सेना वाढवणे कठीण होते. १९९५ पासून हा मतदार संघ "प्रतापगड" झाला. तेव्हा सेनेचे बिनीचे शिलेदार असलेले (स्वर्गीय) दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भगवा ब्रिगेड वाढवली. कालांतराने दिलीपरावांच्या अकाली निधनाने सेनेची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर आली, मात्र विचलित न होता नेत्यांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली. त्यामुळे स्वबळावर सुरू केलेल्या प्रतापरावांच्या या वाटचालीचे "मैं तो अकेला चला था जानिबे मंझील मगर, लोग आते गये कारवा बनता गया....असे रूपांतर झाले.तीच आजच्या अजिंक्य प्रतापगडाची पायाभरणी ठरली. 
  
पहिले यश...!
  या धडपड्या युवा नेत्याच्या मेहनतीला पहिले यश १९८९ च्या मेहकर खरेदी - विक्री संघाच्या निवडणुकीत आले. या निवडणुकीत सेनेचे पॅनल विजयी झाले. राज्यात सेना - भाजपचा वरचष्मा वाढण्याचा व सत्ता येण्याची चाहूल देणारा तो काळ. काँग्रेसला सावध करणाऱ्या त्या छोट्या लढाईनंतर सन १९९० च्या विधानसभा निवडणुका झाल्या. मेहकरातून अर्थात प्रतापराव जाधवांना उमेदवारी मिळाली. बुलडाणा मतदारसंघातून राजेंद्र गोडे तर जलंब मतदारसंघात विजय मिळवून शिवसेनेने जिल्ह्यात दमदार एन्ट्री केली. मात्र मेहकरात शिवसेनेच्या वाघाला पराभूत व्हावे लागले. मात्र या यामुळे नाउमेद न होता त्यांनी मेहकर अर्बन मध्ये विजय मिळवला. त्यापाठोपाठ १९९२ मध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद सर्कल मध्ये विजय मिळवला. ही पदे आणि १९९३ मध्ये मेहकर बाजार समितीचे सभापती पद त्यांच्या राजकीय जीवनातील महत्वाचा टप्पा अन भावी आमदारकीचा भरभक्कम पाया ठरला. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून ते जायंट किलर ठरले. या निवडणुकीनंतर या नेत्याला विजयाची अन् दिग्गजांना पराभूत करून इतिहास घडवण्याची सवयच लागली. एकदा हाती आलेली संस्था, सत्ता, पद कायम एक हाती ठेवणे मग त्यांचा छंद अन जिद्दच झाली. तोपावेते  सेनेत वजन वाढल्याने त्यांना १९९७ मध्ये क्रीडा राज्यमंत्री तर १९९८ मध्ये पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर मात्र ते राजकारणात थांबलेच नाही त्यांची राजकीय घोडदौड सुरूच राहिली.
    
 राखीव मुळे उघडले "खास" दार...
संकट म्हणजे एक संधी देखील असते हे हरलेल्या या लोकनेत्याने मग राज्याची राजधानी सोडून देशाच्या राजधानीकडे लक्ष दिले. नावातच "प्रताप" असणाऱ्या या नेत्याने नवखा असताना हार मानली नाही मग आता स्वतः दिग्गज झाल्यावर हार मानण्याचा प्रश्नच नव्हता.  २००९ च्या लोकसभा लढतीत सेनेने त्यांना उमेदवारी दिली. दिल्लीची लढाई लढण्याचा पहिलाच प्रसंग, समोर उमेदवार कोण तर राजेंद्र भास्करराव शिंगणे... ते इलेक्शन विलक्षण ठरले ..लढाई नव्हे रणसंग्राम झाला.. ते इलेक्शन जिल्ह्यासह विदर्भात गाजले.. पण शेवटी शिवसैनिकच नाचले..डॉ. शिंगणेंना पराभूत करून ते प्रतापराव जाधव एकदा जायंट किलर ठरले..या पाठोपाठ २०१४ आणि २०१९ च्या लढती जिंकून त्यांनी लोकसभेची हॅट्रिक केली. यंदा २०२४ च्या निवडणुकीत तर खा.प्रतापराव जाधव यांनी शांतीत क्रांती घडवली. प्रतिस्पर्धी उमेदवार विजयी झाल्याच्या अविर्भावात राहत असताना खा.जाधव शांत होते, त्यांना विश्वास होता त्यांनी राबवलेल्या प्रचारयंत्रणेवर... अन् अखेर ४ जूनला लागलेला निकाल विरोधकांची वाट लावणारा ठरला..चौथ्यांदा संसदेत पोहचणारे खा.जाधव जिल्ह्यातील पहिले नेते ठरले आहेत. सध्याचे राजकारण बघता हा विक्रम हा बराचकाळ अबाधित राहील अशी चिन्हे आहेत. 
आता देशाची जबाबदारी...
खा.जाधव यांनी चौथ्यांदा विजय मिळवल्यावर संपूर्ण जिल्हावासियांना एकच आस होती ती खा.जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची. २०१४ आणि २०१९ ला प्रचंड व बहुमताने सत्तेत आलेल्या मोदी सरकारवर यंदाच्या निकालाने संकट आणले,त्यामुळे भाजपच्या लेखी मित्रपक्षांचे महत्त्व वाढले. शिवसेनेतही खा. जाधव हेच सिनिअर लीडर असल्याने भाजपवर आलेले संकट खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी संधी घेऊन आले आणि खा.जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले. यामुळे जिल्ह्याच्या या भूमिपुत्रावर आता संबंध भारत देशाची जबाबदारी येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मभूमीतील हा नेता ती जबाबदारी समर्थपणे सांभाळेल यात शंका नाही. खा.जाधव यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित होताच त्यांनी बुलडाणा लाइव्ह ला दिलेली प्रतिक्रिया खा.जाधव यांचा व्यापक दृष्टिकोन दर्शवणारी आहे. मंत्रिपदाचा उपयोग भारतमातेचा गौरव वाढवण्यासाठी , भारतमातेला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी आणि तळागाळतील जनतेची सेवा करण्यासाठी करणार असल्याचे खा.जाधव यांनी म्हटले आहे.