Amazon Ad

BULDANA LIVE EXCLUSIVE माय बापांनो लेकरांना सांभाळा..? जिल्ह्यात सहा महिन्यांत १०२ जणांचे किडनॅपिंग..

 
बुलडाणा(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यासाठी, पालकांसाठी हा आकडा उरात धडकी भरवणारा आहे. लेकरांची काळजी वाढवणारा आहे. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० जून या ६ महिन्यांत तब्बल १०२ जणांचे किडनॅपिंग झाले आहे. स्वतः जिल्हा पोलीस दलाकडून या आकड्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.
  १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा बेपत्ता झाल्यास पोलीस अपहरणाची अर्थात किडनॅपिंगची नोंद करतात. किडनॅपिंग झालेल्या १०२ जणांमध्ये १६ ते १८ वर्षाखालील मुलींचा अधिक समावेश आहे. बहुतांश प्रकरणात प्रियकरासोबत मुली पळून जातात..ज्या वयात जे करायचे नाही ते करून बसतात..त्यांना "त्यातल" सगळ कळत असल्याने त्या स्वतः प्रियकरा सोबत निघून जातात. मात्र कायदा त्यांना सज्ञान समजत नाही त्यामुळे १८ वर्षाखालील मुली जेव्हा घरून निघून जातात तेव्हा अशा प्रकरणांत मुलीला पळवून नेणाऱ्या तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो.
   काही प्रकरणांत मुलीला कुणी नेले याची पक्की खबर मुलीच्या पालकांना नसते त्यामुळे अशा प्रकरणात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले जाते. काही प्रकरणांत घरच्या काही वादातून ,लहान वयात लागलेल्या वाईट सवयी आणि व्यसनामुळे मुले देखील घर सोडून निघून जातात अशा प्रकरणात देखील अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. बहुतांश प्रकरणात आधी अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो, त्यानंतर जेव्हा अल्पवयीन मुलीला प्रियकराच्या ताब्यातून सोडवल्या जाते तेव्हा बाललैंगिक अत्याचाराचे कलम देखील त्यात समाविष्ट करण्यात येते. कारण घरून निघून गेल्यानंतर तर पोलिसांना सापडेपर्यंत त्यांच्यांत शारीरिक संबंध झालेले असतात. जिल्ह्यात झालेल्या १०२ किडनॅपिंगच्या घटनांपैकी पोलिसांनी ८४ प्रकरणांचा यशस्वी तपास केला आहे..१८ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
पालकांनो सांभाळा....
हल्ली ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली बहुतांश अल्पवयीन मुले मुलींकडे स्मार्टफोन असतो. त्यातून जे पहायचे नाही ते देखील त्यांच्या पाहण्यात येते. त्यातून वाढत जाणारे आकर्षण गोत्यात आणते. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसणे म्हणजे कमीपणा वाटायला लागतो. त्यामुळे अल्लड वयात नको ती कामे होतात. आई वडिलांपेक्षा प्रियकर किंवा प्रेयसी महत्त्वाची वाटायला लागते. तो किंवा ती म्हणजे सर्वस्व असे वाटल्याने नको त्या गोष्टी होत्यात. जवळपास सर्वच पालकांना आपल्या मुलांवर मुलींवर खूप विश्वास असतो. आपली "त्यातली" नाही असा ओव्हर कॉन्फिडन्स असतो, त्यामुळेच घात होतो. म्हणून पालकांनी मुला मुलींसोबत प्रेमाने वागावे मैत्रीपूर्ण व्यवहार करावा. आपल्या पाल्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत? यावरही कटाक्ष ठेवणे गरजेचे आहे.