BREAKING रविकांत तुपकरांना अटक;तुपकरांची रात्र पोलीस कोठडीतच!रेल्वे रोको साठी जातांना पोलिसांनी राजुर घाटातून घेतले ताब्यात!

 
Rt
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापूस प्रश्नावर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. सदरचे आंदोलन दडपण्याच्या हेतूने बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना मलकापुरात पोहोचण्यापूर्वीच रात्री अटक केली आहे. तुपकर काल रात्रीपासून भूमिगत होते. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त होता तर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती. सायं.७.०० च्या दरम्यान गाडी बदलून मलकापूर कडे जात असतांना राजुर घाटात पाठलाग करून पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले आहे व तिथून त्यांना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. कलम १५१अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे.
 सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी ऑक्टोबर महिन्यापासून लढा उभारला आहे. एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे,अन्नत्याग, नागपूर अधिवेशनावरील हल्लाबोल आंदोलन आदी आंदोलनाच्या माध्यमाने राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या रेटल्या. परंतु त्याउपरही सत्ताधारी शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत काहीच बोलायला तयार नसल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १९ जानेवारी रोजी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई दिल्ली गुजरात कडे जाणाऱ्या गाड्या अडवून सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ, असा गंभीर इशारा रविकांत तुपकरांनी दिलेला होता. त्यानंतर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी १६ जानेवारी रोजी तर बुलढाणा शहर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी रविकांत तुपकर नोटीस बजावली होती. शिवाय रविकांत तुपकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रविकांत तुपकर सध्या जिल्हाभर एल्गार परिवर्तन मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १७ जानेवारी रोजी या परिवर्तन मेळाव्यासाठी ते सिंदखेडराजा तालुक्यामध्ये होते. सिंदखेडराजा तालुक्यातील मेळावा आटोपल्यानंतर रविकांत तुपकर रेल्वे रोको आंदोलनाच्या अनुषंगाने भूमिगत झाले होते. काल रात्रीपासून ते भूमिगत असल्याने पोलिसांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली होती. त्यांच्या घराभोवती तगडा बंदोबस्त तर होताच शिवाय बुलढाणा कडे येणाऱ्या आणि मलकापूर कडे जाणाऱ्या गाड्यांवर पोलिसांनी करडी नजर होती. दरम्यान सायं.७.०० च्या दरम्यान रविकांत तुपकर गाडी बदलून पोलिसांना चकमा देत मलकापूरच्या दिशेने निघाले असता बुलढाणा ते मलकापूर मार्गावर राजुर घाटात पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडून रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले आणि अटक करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले. रविकांत तुपकरांच्या अटकेची वार्ता कऴताच कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी करायला सुरुवात केली आहे.  
         
 आंदोलन दडपण्याचा हा सरकारचा डाव असून पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे असा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. 
तुपकरांची रात्र पोलीस ठाण्यातच..
 
दरम्यान रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आले असून त्यांचा आजच्या रात्रीचा मुक्काम हा पोलीस ठाण्यातच होणार आहे. पोलीस कोठडीमध्ये सध्या ते असून उद्या सकाळी त्यांना न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे. 
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : रविकांत तुपकर
सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई मागणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा असेल तर असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, ही भूमिका यापूर्वीच मी जाहीर केलेली आहे, असे रविकांत तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. शिवाय आता लोकसभा तोंडावर आहेत आणि मी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव लोकसभेची उमेदवारी लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोणते ना कोणते कारण पुढे करून तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार असे सांगून मला किमान वर्षभर जेलमध्ये डांबून ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परंतु काहीही झाले तरी मी घाबरणार नाही, शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असाच सुरू राहणार आहे, मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.