मोठी बातमी! जिल्हावासियांना आज मिळणार GOOD NEWS? खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी आमदार श्वेताताईंची लक्षवेधी; राज्य सरकार कडून मोठी घोषणा होण्याची शक्यता..

 
shwetatai mahale
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या कैक दशकांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने राज्याच्या हिस्स्याची भरीव तरतूद करावी अशा मागणीचे निवेदन चिखलीच्या आमदार श्वेताताईंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले होते. दरम्यान आज, ८ मार्च रोजी आमदार श्वेताताई याविषयावर लक्षवेधी मांडणार आहेत. आमदार श्वेताताईंच्या लक्षवेधीचा आजच्या कामकाजात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे श्वेताताईंच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा केली जाईल का? जिल्ह्याला गुड न्यूज मिळेल का? असा आशदायी प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आ. श्वेताताईंनी ४ मार्च २०२० ला सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी रेल्वे मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून सदर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक ही झाली होती. खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तांत्रिक टीम बुलडाणा व जालन्यात पाहणी करून गेली होती.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील  सर्व लोकप्रतनिधींची बैठक झाली होती. मात्र केंद्राने पूर्ण तयारी केली असली तरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या हिस्सा भरण्याची हमी न दिल्याने मार्गाचे काम रखडले. 

दरम्यान आता राज्यात सत्ताबदल झाल्याने सध्याचे सरकार खामगाव - जालना रेल्वे मार्गाचा राज्याच्या हिश्श्याचा विषय निकाली काढेल अशी आशा जिल्हावासियांना आहे. आज,८ मार्चला योगायोगाने महिलादिनीच आ. श्वेताताई विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहेत. राज्याने तातडीने आपला हिस्सा भरण्याची हमी द्यावी आणि विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून आ. श्वेताताई करणार आहेत. त्यामुळे लक्षवेधीला राज्य सरकारकडून काय उत्तर येते? राज्य सरकार मोठी घोषणा करून जिल्हावासियांना गुड न्यूज देईल का ? असे आशादायी प्रश्न निर्माण झाले आहेत. आज दुपारनंतर या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.