एसटी कर्मचाऱ्यांसाठी "CM'ना आ. गायकवाडांचे पत्र!; म्‍हणाले...

(पहा व्हिडिओ)
 
संजय गायकवाड

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. नोकरीवर असतानाही राज्यातील ३४ एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची  वेळ यावी हे दुर्दैव आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे. राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते एसटी कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावे. तसे विधेयक हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात यावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. १८-१८ तास काम करूनही कामाचा योग्य तो मोबदला मिळत नाही. मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह तुटपुंज्या पगारावर होत नाही. निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतनही चेष्टा करण्यासाखे आहे. अवैध प्रवासी वाहतूक वाढल्याने एसटी महामंडळ तोट्यात आले आहे. एसटी म्हणजे ग्रामीण भागातील जनतेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे  एसटी कामगारांच्या न्याय मागण्यांसंदर्भात हिवाळी अधिवेशनात विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडावा. सर्वच राजकीय पक्षांनी त्याला समर्थन देऊन ठराव एकमताने पारित करावा, असे आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पहा व्हिडिओ ः