गरिबांना 'घर मिळेल का घर' ? आ.गायकवाडांची घरकुलावर लक्षवेधी

 
u6y
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ मिळविणे म्हणजे अनंत अडचणीचा डोंगर. तो पार करणे प्रत्येकालाच झेपते असे नाही.पण, 'सर्वांना घरे' या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी घरकुल योजना सुरू केली. मात्र योजनेत लाभार्थी यादीचे निकष बदलले. गरजू लाभार्थ्यांना जणू पायघड्याच घातल्या. पहिली यादी रद्द करून दुसरी यादी समोर ठेवल्याने गोरगरिबांच्या हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्न अधांतरी राहिलाय. त्यामुळे पहिलीच यादी कायम ठेवून गरिबांना 'घर देता का घर?' अशी मागणी आज ३० डिसेंबरला आ. संजय गायकवाड यांनी अधिवेशनात रेटली.

हिवाळी अधिवेशनामध्ये आ. गायकवाड यांनी आतापर्यंत विविध प्रश्न मांडले. ३० डिसेंबरला गोर-गरिबांच्या हक्काच्या घरकुलासाठी त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.  गायकवाड म्हणाले की, घरकुलची योजना ही सर्वांना घरे या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी अंमलात आणल्यानंतर  सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये लाभार्थ्याची निवड करण्यात येत होती. यामध्ये ज्याचं घर छपरामध्ये, टीनाचे,कुडाचे,मातीचे आहे. अशा लाभार्थ्यांची निवड करून यादी फायनल झाली. परंतु ती निवड यादी पुन्हा रद्द करून पुन्हा दुसरी यादी तयार केली. ही यादी करताना जॉब कार्ड मॅपिंग पंचायत समितीच्या मार्फत केले.

परंतु हे जॉब कार्ड मॅपिंग करताना ज्या लोकांच्या मोठमोठ्या बिल्डिंग, ५०-५० एकर बागायती आहेत, अशा लोकांनी आधी जाऊन जॉब कार्ड मॅपिंग केले. परिणामी या मोठ्या लोकांची नावं अग्रक्रमाने आली. जो मजूर वर्ग आहे. जो शेतात, जंगलात गेला जो जॉब कार्ड मॅपिंगला जाऊ शकला नाही अशांची नावे मागे पडली. सुरुवातीला मोठ्या लोकांची नावे आल्यामुळे गरजू लोकांमध्ये असंतोष आहे. दरम्यान ही दुसऱ्या नंबरची यादी रद्द करून पहिली यादी जी ग्रामसभेने पाठवली ती कायम करणार का?  हा महत्त्वाचा प्रश्न आ. संजय गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलाय. 'सदर मुद्दा तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल' असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी प्रतिउत्तरात म्हटले आहे.