गावकऱ्यांनो ग्रामपंचायत निवडणुका अविरोध करा अन् मिळवा ५१ लाख! आमदार श्वेताताईंचे आवाहन

 
mahale
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे घोंगावत आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, गावातील वातावरण चांगले रहावे, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी. निवडणूकिसाठी केलेल्या खर्चाची बचत व्हावी यासाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी पुढाकार घेतलाय. चिखली विधानसभा मतदारसंघातील  ज्या गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या अविरोध करा अन् ५१ लाख रुपयांचा निधी मिळवा असे जाहीर आवाहन आ. श्वेताताईंनी केले आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघातील २८ गावांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. गावपातळीवरील निवडणुकांत सलोख्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते. भावा भावात कलह निर्माण होऊन मने कलुशित होतात. त्यामुळे ग्रामपंचायतिच्या निवडणुका अविरोध केल्यास पुढील ५ वर्षांच्या काळात ५१ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आ. श्वेताताईंनी दिली आहे.
    
याआधीही श्वेताताईंनी पाळला शब्द...!

  मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा आमदार श्वेताताईंनी ग्रामपंचायत निवडणुका अविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी २१ लाख रुपयांचा निधी अविरोध होणाऱ्या गावांना  देण्याचा शब्द आ. श्वेताताईंनी दिला होता. चिखली तालुक्यातील ५ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने २१ लाख रुपयांच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या होत्या. यात चांधई, खोर, मालगणी, पळसखेड भट आणि सिंदखेड या ग्रामपंचायतीमध्ये विविध  शासकीय योजनांचा निधी खेचून आणून त्या ठिकाणची कामे सुरू झाली आहेत, तर काही कामे सुरू होणार असल्याने आ. श्वेताताईंनी दिलेला शब्द दीड वर्षांतच पूर्ण केला आहे.