भाऊ आधी घर तर जोडा! जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या होम ग्राउंडवरच काँग्रेसमध्ये "तुझे माझे जमेना"! बॅनर वरून वळगला जिल्हाध्यक्ष बोंद्रेंचा फोटो..

 
mjhb
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काय भाऊ..? अस असतं का हो..आपले नेते राहुल गांधी भारत जोडायला निघालेत, साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा करतायेत, लोकांमध्ये मिसळतायेत, लोकांच्या वेदनांवर फुंकर मारताहेत..शोषित, वंचितांच्या प्रश्नांवर आवाज उठवतायेत.. अन् इकडे आपल्या होमपीचवर काँग्रेसमध्ये ताटातूट आहे. चिखलीतल्याच काँग्रेस कार्यकर्त्यांना तुमचे नेतृत्व मान्य नाही म्हटल्यावर कसं होईल..! चिखलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जर तुमचा फोटो बॅनर वर लावावा वाटत नसेल तर "कुछ तो गडबड है" असच म्हणावं लागेल.

तर मुद्दा असा आहे की,खा.राहुल गांधी उद्या शेगावात येणार आहेत. ५ लाख लोक गर्दी करणार असा आयोजकांचा दावा म्हणजे फुगाच असल्याने मैदानात असलेल्या खुर्च्यांच्या क्षमतेवरून समोर येते. केवळ ४८ ते ५५ हजार खुर्च्या म्हटल्यावर बाकीचे लोक कुठे बसणार? बरं ते जाऊद्या मुद्दा असा आहे की यात्रेचे नाव आहे "भारत जोडो" पण इथे तर जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये अनेक गट पडलेत.

जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या अनेक नेत्यांना राहुल बोंद्रे यांचे नेतृत्व मान्य नाही,खाजगीत अनेक नेते तसे बोलून दाखवतात तर काही बोलत नाही. चिखली म्हणजे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे होमग्राउंड. इथे तर त्यांचा दबदबा असणे अपेक्षित. मात्र प्रत्यक्षात चिखलीत सुद्धा काहींना जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे "भारत जोडो" यात्रेच्या पोस्टर वरून दिसते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जाहेद अली खान उर्फ दादू सेठ यांनी चिखलीत बक्कळ पोस्टर लावलेत. मात्र या पोस्टर वर कुठेही जिल्हाध्यक्ष बोंद्रेंचा फोटो दिसत नाही. त्यांचे आपसात फारसे पटत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यात्रा भारत जोडो ची अन् संदेश काँग्रेस तोडो चा असे एकंदरीत जिल्हा काँग्रेसमधील चित्र आहे. त्यामुळे भाऊ "आधी घर जोडा" असे कुणी म्हणत असेल तर त्यात वावगे काय?