भूपेंद्र यादवांनी स्पष्टच सांगितलं बुलडाण्यात कशासाठी आलो ते.! म्हणाले,२०२४ पर्यंत पुन्हा पुन्हा येईन..!!

 
jhgjh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज १९ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बुलडाण्यात कशासाठी आलो ते  त्यांनी सांगून टाकले.

ज्या लोकसभा क्षेत्रात भाजपचे खासदार नाहीत अशा देशातील १४४ लोकसभा क्षेत्रात भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री जाणार आहेत. मात्र बुलडाणा लोकसभा क्षेत्रात युतीचा खासदार असताना लोकसभा प्रवास योजनेचे कारण काय असा प्रश्न भूपेंद्र यादव यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, जिथे युतीचा उमेदवार आहे तिथे युतीच्या उमेदवाराला विजयी करू. सहयोगी पक्षाला मदत करू. १४० लोकसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी ही प्रवास योजना आहे. भाजपच्या वाढलेल्या ताकदीचा सहयोगी पक्षाला फायदाच होईल

असे ते म्हणाले. लोक आम्हाला धोका देतात मात्र भाजपा युतीधर्माचे पालन करणारा पक्ष असल्याचे यादव म्हणाले.       भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत पुन्हा पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी श्री यादव यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले.

कोविड संकटानंतर मात करून भारताने आगेकूच केली. भाजपचा प्रयत्न समरस समाजनिर्मिती साठी असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर जिल्ह्याला काय मिळाले हे आमदार संजय कुटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील,  माजी आमदार चैनसुख संचेती, तोताराम  कायंदे, भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे उपस्थित होते.