कृषी मित्र सचिन बोंद्रेंनी भारत जोडो यात्रेत घेतली खा. राहुल गांधींची भेट; विदर्भातील शेतकरी आत्महत्या व सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर वेधले लक्ष!

नांदेडच्या सभेत राहुल गांधींनी केला उल्लेख
 
sachinbondre
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड  प्रतिसाद मिळत आहे. यात्रा सध्या महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत असून  काँग्रेसचे नेते, कृषीमित्र सचिन बोंद्रे हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान सचिन बोंद्रे यांनी  खा. राहुल गांधींची भेट घेतली, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर व सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सचिन बोंद्रेंनी  राहुल गांधींशी चर्चा केली.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सोयाबीन कापसाचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारकडून नुकसानभरपाई नाही. केंद्र,राज्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या ५० टक्के हमीभाव मिळाला पाहिजे या मुद्द्यांवर खा.राहुल गांधींशी सचिन बोंद्रे यांनी चर्चा केली.

या बाबी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबतीत महत्वाच्या आहेत. या मुद्यांवर लोकसभेत आवाज उठवणार असल्याची ग्वाही खा.राहुल गांधी यांनी सचिन बोंद्रे यांना दिली. विशेष म्हणजे त्यानंतर झालेल्या नांदेड येथील सभेत खा. राहुल गांधी यांनी  शेतकरी आत्महत्या आणि शेतमालाच्या भावाच्या मुद्द्यांना  हात घातला. खा. राहुल गांधींशी झालेली भेट उर्जादायी होती,  विदर्भ , मराठवाड्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  अडचणी त्यांनी समजून घेतल्या अशी प्रतिक्रिया सचिन बोंद्रेंनी दिली आहे.