पेपर फुट प्रकरणात एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा! आरोपीच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक अहवालावर उलगडणार तपासातील बारकावे;

३१ मार्चपर्यंत एसपींकडे अहवाल सादर होण्याची शक्यता! आतापर्यंत काय काय झाले वाचा..

 
crime

बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्यभर गाजलेल्या बारावीच्या गणिताच्या पेपरफुट प्रकरणात पोलीस विभागाने विशेष चौकशी पथक नेमले होते. या प्रकरणात आठ आरोपींना अटकही झाली. मात्र एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा अद्याप कायम असून आरोपीच्या मोबाईलचे फॉरेन्सिक अहवालावर तपासातील बारकावे उलगडणार आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शासन प्रयत्न करत असतांना सिंदखेड राजा येथील प्रकरणाने यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या आहेत.परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून ३ मार्च रोजी बारावीचा गणिताचा पेपर फुटला. हे पेपर फुटीचे प्रकरण राज्यभर गाजले. दरम्यान, शिक्षण विभागाच्या वतीने सिंदखेड राजा येथे तक्रार देण्यात आली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण साखरखेर्डा पोलिस ठाण्या अंतर्गत असल्याने तिकडे वर्ग करण्यात आले.  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी तपास सूत्रे हलवली.  या प्रकरणाची व्याप्ती पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी  ६ मार्च रोजी विशेष चौकशी पथक यासाठी  नेमले होते. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार हे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांना तपास कामी मदत म्हणून लोणारचे सपोनि. शरद अहेर, देऊळगाराजाचे पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे , पोहेका. निवृत्ती पोफळे, पोना. पवन मखमले ( सायबर पोस्ट बुलढाणा ) , पोकॉ. प्रदीप सौभागे ( साखरखेर्डा ) व अनिल शिंदे ( लोणार ) या सहा जणांची नेमणूक आहे. 

सुरुवातीला पाच, नंतर दोन आणि पाठोपाठ एक असे आठ आरोपी या प्रकरणात अटक करण्यात आले. यातील चार शिक्षकांना निलंबितही करण्यात आले. तर तीन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
यात लोणार येथील जाकिर हुसेन उर्दू स्कूलमधील प्राचार्य अब्दुल अकील अब्दुल मुनाफ हाच मुख्य आरोपी असल्याचे तपासात पुढे आल्याचे सूत्राने सांगितले होते. मात्र या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटी चा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मुख्यत्वेकरून प्राचार्य अब्दुल अकिल अब्दुल मुनाफ यांच्या मोबाईलचे फॉरेन्सिक डिटेक्शन यायचे बाकी आहेत. त्यातच समिती प्रमुख यामावर हे  दरम्यानच्या काळात इतर प्रशासकीय कामासाठी गुंतले असल्याची माहिती आहे. पेपर फूट प्रकरणांमध्ये एसआयटी चा अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एसआयटीचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्याकडे सादर होऊ शकतो.