रायपुरचा पांडेबा निघाला खादाड! सातबारा वर वारसाहक्काने नोंद करण्याचे मागत होता ४००; रक्कम घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडला

पांगरी येथील एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार केली होती. तक्रारदार शेतकऱ्याचे वडील मार्च २०२२ मध्ये मयत झाले होते. शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे रायपूर शिवारात असलेल्या शेतीच्या ७/१२ वर वारसाहक्काने शेतकऱ्याची व इतरांची नोंद करायची होती. या कामासाठी तलाठी उबरहंडे याने शेतकऱ्याला ४०० रुपयांची लाच मागितली होती. शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्याने शेतकऱ्याने एसीबी कडे तक्रार दिली होती. दरम्यान ३० जानेवारीला एसीबी ने केलेल्या पडताळणी कारवाईत उबरहंडे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले.
आज,८ फेब्रुवारीला रायपूर ग्रामपंचायत आवारात उबरहंडे याला ४०० रुपये द्यायचे ठरले होते. त्यानुसार आधीच ठरलेल्या योजनेनुसार एसीबी च्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. तक्रारदार शेतकऱ्याने ४०० रुपये उबरहंडे याच्या हातावर टेकवताच एसीबीने झडप घालून लाचखोर तलाठ्याला जेरबंद केले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप, बुलडाणा एसीबी चे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा एसीबी चे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे,पोना प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, स्वाती वाणी यांनी केली. आरोपी तलाठी उबरहंडे याच्याविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.