आईचे २ वर्षांपूर्वी निधन झाले, देऊळघाटच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कुणाची वाईट नजर पडली? वडिलांचा पोलीस ठाण्यात टाहो..वाचा नेमक काय घडलं..

 
crime

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ५ मुली अन् २ मुले असा त्यांचा परिवार..पण दोन वर्षाआधी त्या ७ लेकरांच्या आईचे आजारपणामुळे निधन झाले..५ पैकी ४ मुलींचे लग्न झालेले, त्यामुळे एक मुलगी आणि २ मुलांचा सांभाळ वडीलच करायचे..मात्र आईविना पोरकी झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कुण्यातरी भामट्याची वाईट नजर पडली आणि अनर्थ घडला..मुलीचे कुणीतरी अपहरण केले, कुणी केले,कुठे नेले याबद्दल माहिती नसल्याचे मुलीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील ही घटना आहे. पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील शेती करतात, २ वर्षाआधी त्यांच्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या ४ मुलींचे लग्न झाले असून लहाण्या मुलीने शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, लहान मुलगी सध्या १७  वर्षे ६ महिन्यांची असल्याचे तक्रारीत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे.

"त्या" दिवशी काय घडल?

९ ऑक्टोबरला सकाळी मुलीचे वडील आणि दोन्ही भाऊ शेतात गेले होते. मुलगी घरी एकटीच होती. सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास वडील आणि भाऊ काम आटोपून घरी परत आले. मात्र यावेळी त्यांना त्यांची मुलगी दिसून आली नाही.  गावात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊनही सापडली नाही. सकाळी ९ वाजता ती दिसली होती पण त्यानंतर ती दिसली नाही असे शेजाऱ्यांनी सांगितले. या प्रकारामुळे हैराण झालेल्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली आहे.