कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; चिखली तालुक्यातील घटना

 
किराणा दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या; शेगाव तालुक्यातील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, ३१ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास असोला (ता. चिखली) येथे समोर आली. उकंडा तोपा राठोड (५५, रा. असोला, ता. चिखली) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
उकंडा राठोड यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. आज दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी राहत्या घरात छताला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथे पाठविण्यात आला. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उकंडा राठोड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.