अतिवृष्टीचा आणखी एक बळी!
मलकापूर तालुक्यातील घटना
Nov 12, 2021, 19:22 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारीपणाला कंटाळून ५० वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवनी भालेगाव (ता. मलकापूर) येथे समोर आली. अजाबराव उत्तमराव तायडे(५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
तायडे यांच्यावर बँक ऑफ इंडिया व महिंद्रा फायनान्सचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. काल रात्री ते शेतात गेले व शेतातच विष घेतले. ही बाब सकाळी उघडकीस येताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.