घरात पिस्टल, तलवार कशाला? राडा करायच्या नादात कोठडीची हवा खावी लागेल भावा! घाटाखाली "एवढ्या" रुपयांत मिळतो देशी कट्टा; बऱ्हाणपूर, इंदोर मधून येतात जिल्ह्यात घातक हत्यारे!

जिल्ह्यात वर्षभरात आर्म ॲक्टच्या ४३ कारवाया

 
yffy
बुलढाणा: (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गुन्हेगारीमध्ये वर्चस्व राहिले पाहिजे, आपली दहशत कायम राहून लोकांनी आपल्याला  घाबरले पाहिजे. राडा करता आला पाहिजे, या आणि अशा अनेक कारणांनी जिल्ह्यात देशी कट्ट्यांसह धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरी गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाया केल्या आहे. अशा राडाबहाद्दरांना जेलची हवा खावी लागत असल्याचे चित्र आहे.

 जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच घातक शस्त्राच्या बळावर शारीरिक व मालमत्तेचे गुन्हे घडू नयेत, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. मागील वर्षात  तत्कालीन एलसीबी प्रमुख बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आर्म ॲक्टच्या ४३ कारवाया करून अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. तर २०२३ या वर्षातही या कारवायांना गती दिली जाणार असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.

शस्त्रे येतात कुठून ?

जिल्ह्यात पिस्तूल आणि धारदार शस्त्रे ही मध्य प्रदेश, अजमेर, इंदूर येथून येत आहेत. विशेष म्हणजे, घाटाखालील काही भागांतील गावांत २५ हजारांपासून एक लाखांपर्यंत शस्त्रे बनवून दिली जातात. केवळ खंडणी मागणीसाठी आणि गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व कायम राहावे म्हणून शस्त्रे खरेदी केली जात असल्याची माहिती आहे.संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आर्म ॲक्टच्या सर्वाधिक कारवाया झाल्याची माहिती आहे.

एलसीबी प्रमुख म्हणतात....

विना परवाना शस्त्र बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशांवर कारवाई केली जाते. जिल्ह्यात कोणीही विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत पसरविल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे 
 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे म्हणाले.