चिखली -मेहकर रस्त्यावर पुन्हा अपहरण नाट्याचा थरार.! माझ्या ३ वर्षांच्या चिमुकल्याला पळवले हो,शेतात जाणाऱ्या महिलेचा आक्रोश! खरे समोर आल्यावर सगळ्यांनी लावला कपाळाला हात..

 
jitendr aadole
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. याच अफवेमुळे जळगाव जमोद, जानेफळ, डोणगाव येथे निरपराधांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसांपूर्वी साखरखेर्डा येथेही एका दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा पसरली होती,मात्र त्या बंडखोर मुलाने स्वतःच हा अपहरणनाट्याचा बनाव रचल्याचे  उघडकीस आले होते. दरम्यान आज, २५ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास  साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लव्हाळा ते पिंपळगाव उंडा रस्त्यावर पुन्हा अपहरण नाट्याचा थरार  रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्यांनी अनुभवला. रस्त्यावर एक महिला जोरजोरात आक्रोश करीत रडत होती. कुणीतरी तिच्या ३ वर्षांच्या मुलाला पळवून मेहकरकडे घेऊन गेल्याचे सांगत ती रडत होती. यामुळे मेहकर - चिखली रस्त्यावर लोकांचा एकच जमाव जमला. महिलेच्या डोळ्यातील अश्रू पाहून हे खरेच असेल असेच सगळ्यांना वाटले. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंत या घटनेतले सत्य समोर आले अन् उपस्थित सगळ्यांनाच कपाळावर हात मारण्याची वेळ आली.
   

 तर त्याचे झाले असे की, मोहखेड येथील एक महिला ३ वर्षांच्या मुलाला व ५ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन शेतात जात होती. मुले महिलेच्या मागे मागे येत होती. लव्हाळा ते पिंपळगाव उंडा दरम्यान मुख्य रस्त्याच्या खाली उतरून महिला शेतरस्त्याने जात होती. काही वेळाने महिलेने मागे वळून बघितले असता ३ वर्षांचा मुलगा दिसला नाही. त्यामुळे महिलेने मुलाचा शोध घेतला, महिला ओरडत ओरडत पुन्हा चिखली - मेहकर या मुख्य रस्त्यावर आली आणि आक्रोश करत रडू लागली. 

 महिलेचा आक्रोश पाहून रस्त्यावरील येणारे जाणारे लोकही थांबले. आपल्या मुलाला कुणीतरी मोटारसायकलवर बसवून मेहकर कडे घेऊन गेले असे सांगत ती रडत होती. याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. विलंब न करता पोलीस तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. 

अन् कपाळावर हात मारून घेण्याची वेळ..

   दरम्यान काही वेळातच लव्हाळा गावचे सरपंच दिनकर कंकाळ यांचे वडील मधुकर कंकाळ हे त्या ३ वर्षांच्या मुलाला स्कूटीवर घेऊन जिथे जमाव जमला होता तिथे पोहचले. हा मुलगा रस्ता चुकून आमच्या शेतात आला होता. मी गवत कापत होतो,तिथे हा मुलगा रडत होता. त्यामुळे मी त्याला घेऊन आलो असे त्यांनी सांगितले हे ऐकताच उपस्थित सगळ्यांनाच कपाळाला हात लावायची पाळी आली..
  
ठाणेदार जितेंद्र आडोळे म्हणतात..
 
  मुले पळवणारी कोणतीही टोळी नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कदाचित या घटनेत हा मुलगा शेतातील लांडगा, कोल्हा, बिबट्या सारख्या हिंसक प्राण्याच्या तावडीत सापडला असता तर मुलाचे अवयव चोरट्यांनी काढून नेले अशीही आरोळी उठली असती. नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी लोकांना केवळ संशयावरून मारहाण करू नये.