लम्पीच्या मदतीचा 'गोचीडप्रश्न' रुतलेलाच! मोठ मोठ्या बाता, मदत तर द्या आता; १५२ प्रस्ताव धूळखात, पशुपालकांमध्ये रोष
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली. अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली.मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी, पशुपालक यांच्याकडे असलेल्या पशुधनाचा मृत्यू झाला, अशा सर्व शेतकरी,पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आलेत..
या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे वाटले. परंतु या मदतीची कासवगती दुर्दैवी म्हणावे लागेल. कारण ४ हजार ८२७ अर्थसहाय्य प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी ४ हजार ६७५ मंजुरी मिळालेल्या दाखल प्रस्तावातून ८.२६ कोटींचा निधी वाटप करण्यात आला. शिवाय बाजारभाव प्रमाणे ही मदत देण्यात आली नाही. त्यामुळे पशुपालकातून रोष व्यक्त केला जात आहे.