अतिवृष्टीने खचला शेतकरी!जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; सरकारला लाज नाही...

मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील शेतकरी नामदेव रामदास शिर्के(५०) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे . मात्र सततची नापिकी, अतिवृष्टी व वाढत्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक कृषी शाखा मलकापूरचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.
दरम्यान दुसरी आत्महत्येची घटना चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारात समोर आली. चिखली तालुक्यातील केळवद येथील एम. ए. डी. एड झालेल्या उच्चशिक्षित शेतकऱ्याने अंचरवाडी शिवारातील खडकपूर्णा कालव्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. समाधान विठ्ठल पांढरे ( ३२, रा. केळवद) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. समाधान पांढरे यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू शेती होती. केळवद स्टेट बँक शाखेचे त्यांच्यावर १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज होते. अतिवृष्टी व सततच्या नापिकीमुळे होणाऱ्या आर्थिक विवंचनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.