खळबळजनक! शेतीच्या वादातातून चुलत्याने केला पुतण्याचा खून;बुलडाणा तालुक्यातील कुंबेफळची घटना! जिल्ह्यात यंदा धुऱ्याच्या वादातून ६ जणांचे मर्डर..!

 
dhad
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धुऱ्याच्या वादातून कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात शेतीच्या वादातून ५ जणांचे खून झाले आहे. दरम्यान यात आणखी एका खुनाची वाढ झाली असून शेतीचा वाद विकोपाला गेल्याने पुतण्याने चुलत्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल, २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी बुलडाणा तालुक्यातील कुंबेफळ येथे ही घटना घडली आहे.

शेषराव रामा जाधव (५५, रा. कुबेफळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक शेषराव जाधव यांचे गावाशेजारी शेत आहे. त्यांच्या शेताशेजरीच  त्यांचा पुतण्या समाधान पंडित जाधव(३५) याचेही शेत आहे. दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचे वाद होते.

दरम्यान काल, सायंकाळी शेषराव जाधव हे त्यांच्या शेतातील कपाशी पिकाला पाणी देत होते. त्याचवेळी तिथे त्यांचा पुतण्या समाधान जाधव आला. जुन्या वादातून दोघांमध्ये शाब्दिक  बाचाबाची झाली. मात्र समाधान जरा वेगळ्याच इराद्याने आला होता. त्याने धारधार शस्त्राने चुतल्याच्या पोटात सपासप वार केले. चुलता रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर समाधान जाधवने घरी जाऊन कपडे बदलले आणि स्वतः धाड पोलीस ठाण्यात जाऊन खून केल्याचे सांगितले. तातडीने धाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतक शेषराव जाधव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. रात्री उशिरा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.