BIG BREAKING समृद्धीवर वाहने सुसाट!ट्रॅव्हल्स पलटली, ३० प्रवासी जखमी!अपघातानंतर उभ्या प्रवाशाला ट्रकने चिरडले! आज पहाटेची घटना

 
tyyr
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. समृद्धीवर वाहने सुसाट धावत असल्याने, आज,२० जानेवारीच्या पहाटे नागपूर- औरंगाबाद धावणारी ट्रॅव्हल्स  देऊळगाव राजा नजीक असोला गावाजवळ पलटी झाली. या झालेल्या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशाला ट्रकने चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नुकतीच समृद्धी महामार्गावर स्विफ्ट कारचा चुराडा होऊन शिवनीपिसा नजीक तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर २ जखमी झाल्याची घटना घडली होती. बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ११ डिसेंबर रोजी झाले. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर ते शिर्डी प्रवास करत या मार्गाची चाचणी केली होती. या संपूर्ण महामार्गाची बांधणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने केली आहे.

असं असतांना हा महामार्ग वाहतुकीकरता सुरु झाल्यावर या मार्गावरील पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप होत आहे. असे असले तरी, समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज पहाटे ४ वाजता च्या दरम्यान राही कंपनीची ट्रॅव्हल (एम एच ट्वेंटी एल ४९९९) नागपूर वरून औरंगाबाद कडे जात होती. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने देऊळगाव राजा नजीक असोला गावाजवळ ट्रॅव्हल पलटी झाली. या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशाला ट्रकने चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारार्थ सिंदखेड राजाला हलविण्यात आल्याची माहिती आहे.