चिंताजनक! आणखी एका शेतकरीपुत्राचे धगधगले सरण! बलडाण्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतोय;३१६ आत्महत्यांची धग शासनाकडे पोहोचलीच नाही! चांडोळच्या शेतकरीपुत्राने आवळला गळफास

 
Tguu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकरी आत्महत्या दिवसागणिक वाढत आहेत. मात्र शासनाकडून समुपदेशन तर सोडाच त्यांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी सुद्धा प्रशासकीय उंबरठे झिजवावे लागतात. गेल्या वर्षात ३१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ७९ प्रकरणात शासकीय मदत मिळाली असली तरी, ७२ प्रकरणी चौकशीवर आहे. काल शुक्रवारी रात्री चांडोळ येथून जवळ असलेल्या ग्राम ईरला येथील अल्पभूधारक शेतकरीपुत्र ऋषिकेश बाबुराव सरोदे (२३) याने  घरातील छताच्या हुकेला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

 ईरला येथील ऋषिकेश बाबुराव सरोदे या युवकाने घरातील छताच्या लोखंडी हूकेला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मृतकाचे काका मुरलीधर सरोदे यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी धाड पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व त्यांचे सहकारी यांनी येऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक ऋषिकेश हा चिखली येथे महावितरण विभागात कंत्राटी पद्धतीने काम करायचा.तो अतिशय मनमिळावू स्वभावाचा होता.

या दुर्दैवी घटनेची हवा व्यक्त होत असली तरी, प्रशासकीय यंत्रणे विरोधात रोष व्यक्त होत आहे. २०२२ या वर्षातील डिसेंबर अखेर ३१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक ३२ आत्महत्या ऑगस्ट महिन्यात झाल्या. जानेवारीत २८, फेब्रुवारी २३, मार्च २१,  एप्रिल २७, मे २८, जून २५,जुलै २२, ऑगस्ट ३२, सप्टेंबर २७, ऑक्टोबर २९, नोव्हेंबर २५, डिसेंबर २९ अशा एकूण ३१६ शेतकरी आत्महत्या झाल्या.त्यापैकी ८३ शेतकऱ्यांचे वारस शासकीय मदतीस पात्र ठरले तर १६१ अपात्र ठरले. ७२ प्रकरणी चौकशीवर असून, प्रत्यक्षात ७९ प्रकरणात शासकीय मदत मिळाली आहे. आज आणखी एका शेतकरी पुत्राच्या आत्महत्येची यामध्ये भर पडली आहे.