सापाने घेतला दोघींचा जीव!झोपेत विषारी साप चावल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; निंदन करतांना साप चावल्याने महिलेचा मृत्यू !

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नागपंचमीच्या पूर्वसंध्येलाच सर्पदंशाने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव जट्टू येथे झोपेत विषारी साप चावल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर खामगाव तालुक्यातील हिंगणा कोरेगाव येथे शेतात निंदन करीत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू झाला.

किनगाव जट्टू  येथील आरती विष्णू वाघमारे (१२) या मुलीला झोपेत साप चावला. काहीतरी चावल्याचे तिच्या आजीला सांगितले . घरात इकडे तिकडे शोधल्यावर काहीच दिसले नाही. दरम्यान त्रास वाढत असल्याने तिला रात्रीच तात्काळ बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सर्पदंश झाल्याचे निदान केले. प्राथमिक उपचार करून तिला जालना येथे हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

दुसऱ्या घटनेत खामगाव तालुक्यातील हिंगणा कोरेगाव येथील  कुसुमबाई  नवलसिंग पाटील या शेतात निंदन करीत होत्या. त्यावेळी अचानक सापाने त्यांना चावा घेतला. त्यांना तातडीने उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागपंचमी सणाच्या पूर्वसंध्येलाच दोघींचा साप चावल्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.