मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरायच्या आधी पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना उचलले; हेलिकॉप्टर उडाल्यावर सोडले; विनायक सरनाईक म्हणाले, आम्ही काय आतंकवादी आहोत का?

 
jhjhh
इसरुळ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,१२ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १२:२० ला मुख्यमंत्री इसरुळ येथील श्री.संत चोखोबारायांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार होते. मात्र तांत्रिक कारणास्तव मुख्यमंत्री  तब्बल दोन तास उशिरा कार्यक्रमस्थळी पोहचले. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर इसरूळ येथे उतरण्यापुर्वी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विनायक सरनाईक यांच्यासह चौघांना ताब्यात घेतले, कार्यक्रम स्थळापासून ३ किमी अंतरावर असलेल्या शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांना तिथे बसवण्यात आले. अखेर कार्यक्रम आटोपल्यानंतर तासाभराने पोलिसांनी त्यांना सोडून दिले. विनायक सरनाईक यांनी पोलिस प्रशासनाच्या या कृत्याचा निषेध केलाय.

विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात   १५० ते २०० शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. चिखलीचे व्यापारी गाडे बंधूंनी शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन कोट्यावधी रुपयांनी फसवणूक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली असली तरी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मात्र कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालून पीडित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करावी अशी मागणी सरनाईक मुख्यमंत्र्यांना भेटून करणार होते. मात्र मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरायच्या आधीच पोलिसांनी सरनाईक यांना ताब्यात घेतले, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर इसरूळ येथून उड्डाण केल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. पोलिस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देत आहेत, आम्ही काय आंतकवादी आहोत का? शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या करायच्या नाहीत तर मग कुणाकडे करायच्या? असे सवाल सरनाईक यांनी केले आहेत.