चिखलीच्या स्टेट बँकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठिय्या आंदोलन! ग्राहक सेवा केंद्राच्या "त्या" बाईने लय जणांना लावला होता चुना; गोरगरीबांना अजून मिळेना पैसे... ​​​​​​​

 
njd
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  स्टेट बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्र चालवणाऱ्या रत्नमाला भंडारे या महिलेने स्टेट बँकेच्या अनेक ग्राहकांना फसवल्याचा प्रकार काही महिन्यआधी उजेडात आला होता. याप्रकरणी त्या फसव्या महीलेविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ महिन्यांच्या आत ज्यांची फसवणूक झाली त्यांना पैसे परत करण्यात येतील असा शब्द बँक प्रशासनाने दिला होता, मात्र विहित कालावधी उलटून देखील गोरगरिबांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आज,२९ ऑगस्टला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने स्टेट बँकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
 

रत्नमाला भंडारे या महिलेकडे ग्राहक सेवा केंद्र असल्याने अनेक ग्राहकांनी तिच्याकडे पैसे जमा केले होते. मात्र तिने बोगसगिरी केली, पैसे नागरिकांच्या खात्यात जमा केलेच नाहीत. काहींनी खात्यातील रक्कम तपासली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जवळपास १०० पेक्षा अधिक जणांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ३ महिन्यांत फसवणूक झालेल्यांचे पैसे करण्यात येतील असा पवित्रा बँक प्रशासन व ज्या कंपनीने हे ग्राहक सेवा केंद्र दिली होते त्या "दृष्टी" कंपनीने दिला होता. मात्र ३ महिने उलटून देखील नागरिकांना पैसे मिळाले नाही. 

अखेर आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे,गजानन पवार यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. ज्यांची फसवणूक झाली ते नागरिक देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.