रविकांत तुपकरांना बुलडाण्यात आणले!; निवासस्थानासमोरच सत्याग्रह सुरूच!!

म्‍हणाले, प्राण गेले तरी मागे हटणार नाहीच... 
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना काल, १७ नोव्हेंबरला रात्री साडेअकराला नागपुरात आंदोलनास्थळी अटक करण्यात आली होती. त्‍यानंतर नागपूर पोलिसांनी आज, १८ नोव्‍हेंबरला पहाटे पावणेसातच्या सुमारास त्‍यांना बुलडाण्यात आणले. मात्र इथेही तुपकरांनी निर्धार कायम ठेवला असून, प्राण गेले तरी मागे हटणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत अन्‍नाचा कणही पोटात जाणार नाही, असे म्हणत त्यांच्या बुलडाणा शहरातील अष्टविनायकनगरातील निवासस्थानासमोरच अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू ठेवला आहे.

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी उपराजधानी नागपुरातील संविधान चौकात काल सकाळपासून अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू होते. मात्र रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास तुपकरांना पोलिसांनी कायदा, सुव्यवस्‍था आणि १४४ कलम लागू असल्याच्या कारणाखाली अटक केली. अटकेपूर्वी पोलिसांनी तुपकर यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रविकांत तुपकरांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूर-अमरावतीमार्गे बुलडाण्यात आणण्यात आले. तब्येत बरी नसल्याने त्यांना पोलिसांनीही अन्‍न घ्या, अशी विनंती प्रवासादरम्यान केली. मात्र तुपकरांनी विनंती फेटाळली. सकाळी बुलडाण्यात दाखल झाल्यानंतर घरासमोर सतरंजीवर बसून त्यांनी अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला. यावेळी नागपूर व बुलडाणा पोलिसांचा कडा पहारा त्यांच्या निवासस्थानसमोर लावण्यात आला आहे.

नागपूर पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर दडपशाही करून मला अटक केली. मात्र कुठेही नेण्यात आले तरी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत अन्‍नत्याग आंदोलन सुरूच ठेवेन अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे निवासस्थानाबाहेर सुद्धा हा अन्‍नत्याग सत्याग्रह सुरूच राहणार आहे. आज, १८ नोव्हेंबरला गावागावात शेतकरी पारावर व चावडीवर धरणे आंदोलन करणार आहे. उद्या रास्तारोको व परवा २० नोव्हेंबरला कडकडीत गावबंद पाळण्यात येणार आहे. सरकारने कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी आता आंदोलनाची दिशा बदलणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत  मागे हटणार नाही. सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकरी आता एकवटला आहे, असे तुपकर बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाले. सोयाबीनला किमान ८ हजार, कपाशीला १२ हजार रुपये भाव जाहीर करावा. सोया पेंडची आयात थांबवावी, १०० टक्के पीकविमा, शेतातील लोडशेडिंग व कनेक्शन कापणे बंद करा, सक्तीची वीज वसुली बंद करा, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करा आदी मागण्यांसाठी हा सत्याग्रह सुरू आहे.