ताब्यातील जमिनीचे कायम पट्टे देण्यासह , विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा...भूमि हक्क परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण!

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ताब्यात असलेल्या जमिनीचे कायम पट्टे द्यावे, वन विभागाने चुकीची कारवाई करू नये, वन जमिनीत पेरण्याची परवानगी द्यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भूमी हक्क परिषदेने काल ४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
  यासंदर्भात प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ न्याय दावा अशी मागणी भूमी हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करीम शाह यांच्या नेतृत्वात कालपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने भूमी हक्क परिषदेचे पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. वेळोवेळी निवेदन देऊनही शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले आहे. कित्येक दिवसांपासून ताब्यात असलेल्या जमिनीवर शेती करून शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे वन विभागाने चुकीची कारवाई करू नये व जमिनीचा कायमचा पट्टा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.